मुंबई, ता. ३० : राज्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे २२ जिल्ह्यांतील चार लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राज्यात २६ ते २८ नोव्हेंबर या तीन दिवसांत झालेल्या अवकाळीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राची ही आकडेवारी गुरुवारी जाहीर करण्यात आली.
यानुसार नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका यवतमाळ जिल्ह्याला बसला आहे. त्या खालोखाल बुलडाणा आणि नाशिक जिल्ह्याचे नुकसान झाले आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाच्या अंदाजानुसार बाधित क्षेत्राचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
मदत आणि पुनर्वसन विभागाने दिलेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाड तालुक्यांना या आपत्तीचा फटका बसला असून ९१ हेक्टरवरील भाजीपाला आणि आंब्यांचे नुकसान झाले आहे.
पालघर जिल्ह्यातील पालघर, वसई, वाडा, डहाणू, जव्हार, विक्रमगड तालुक्यातील ५४८ हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाला, भात, नागली, वरई, कडधान्य या पिकांचे नुकसान झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ५३ हेक्टर क्षेत्रावरील भात पिकाचे नुकसान झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केवळ एक हेक्टर क्षेत्रावरील फळझाडांचे नुकसान झाले आहे.
कांदा, द्राक्षाचे नुकसान
नाशिक जिल्ह्यातील कळवण, नांदगाव, नाशिक, निफाड, त्रंबकेश्वर, सटाणा, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, सिन्नर, चांदवड आणि येवला तालुक्यातील ३३ हजार ३८८ हेक्टरवरील कांदा, द्राक्ष, सोयाबीन, मका, गहू, ऊस आणि फळपिकांना गारपिटीचा फटका बसला आहे.
धुळे जिल्ह्यातील साक्री, शिरपूर, शिंदखेडा तालुक्यातील २३४ हेक्टर क्षेत्रावरील केळी, पपई, कापूस, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, अक्कलकुवा, नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्राणी तालुक्यातील २,७८३ हेक्टरवरील भात, कापूस, तूर, मिरची, मका, कांदा पीक भुईसपाट झाले आहे.
जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, एरंडोल, पारोळा, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, भडगांव तालुक्यातील ९०५ हेक्टर क्षेत्रावरील कांदा, हरभरा, गहू, मका, ज्वारी आणि फळपिकांचे नुकसान झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर अकोले, कोपरगाव, पारनेर, राहता, पाथर्डी, श्रीगोंदा, श्रीरामपूर, नेवासा तालुक्यातील १५ हजार ३०७ हेक्टर क्षेत्रावरील केळी, पपई, मका पिकांचे नुकसान झाले आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, शिरूर तालुक्यातील ३५०० हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष, कांदा तर सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील १५ हेक्टर क्षेत्रावरील भात पिकाचे नुकसान झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री तालुक्यातील ४५ हजार ७८३ हेक्टर क्षेत्रावरील केळी, पपई, मका, ज्वारी, कापूस, तूर, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे.
जालना जिल्ह्यातील बदनापूर, जालना, जाफ्राबाद, भोकरदन, घनसावंगी तालुक्यातील १३ हजार ०४९ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष, केळी, कांदा, खरीप ज्वारी, गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील परळी, बीड तालुक्यातील २१५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यातील ७९ हजार ४०२ हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाला, तूर, कापूस, ज्वारी, गहू, हरभरा नुकसान झाले आहे. परभणी जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, जिंतूर, पाथरी, पूर्णा, पालम, मानवत, सोनपेठ, सेलू तालुक्यातील एक हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बी ज्वारी, कापूस, सीताफळ, पेरू, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.
नांदेड जिल्ह्यातील नांदेड, मुदखेड तालुक्यातील ५० हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकांचे नुकसान झाले आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा , नांदुरा, लोणार, सिंदखेडराजा, देउळगावराजा, संग्रामपूर, मेहकर, जळगाव जामोद, मलकापूर, खामगाव, शेगाव, मोताळा, नांदुरा तालुक्यातील ६३ हजार २५० हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाल्यासह मका, तूर, कापूस, द्राक्ष पिकांचे नुकसान झाले आहे.
अकोला जिल्ह्यातील अकोला, तेल्हारा, पातूर तालुक्यातील ६ हजार ८२१ हेक्टर क्षेत्रावरील तूर, हरभरा, गहू, कापूस, भाजीपाल्याला आपत्तीचा फटका बसला आहे.
वाशिम जिल्ह्यातील एका तालुक्यातील ४६२ हेक्टर क्षेत्रावरील तूर, मका, कापूस, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, कळंब, घाटंजी, राळेगाव, बाभूळगाव, पुसद, मारेगाव तालुक्यातील १ लाख २६ हजार ४३८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, भामरागड तालुक्यातील ३० हेक्टर क्षेत्रावरील भात पिकाचे नुकसान झाले आहे.
जिल्हानिहाय नुकसान
रत्नागिरी ५३
सिंधुदुर्ग ११२
नाशिक ३३३८८
धुळे २३४
नंदुरबार २७८३
जळगाव ९०५
अहमदनगर १५३२०७
पुणे ३५००
सातारा १५
छ. संभाजीनगर ४५७८३
जालना १३०४९
बीड २१५
हिंगोली ७९०२
परभणी १०००
नांदेड ५०
बुलडाणा ६३२५०
अकोला ६९२१
वाशीम ४६२
यवतमाळ १२६४३८
गडचिरोली ३०
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.