बोर्डाच्या परीक्षेचे टेन्शन नकोच! विद्यार्थ्यांनो ‘ही’ चतु:सूत्री लक्षात ठेवा, नक्की पडतील चांगले गुण

बोर्डाची परीक्षा म्हटले टेन्शन आणि ऐन परीक्षेवेळी आजारी पडतात. त्याचा परिणाम गुणावर होतो. त्यामुळे तणाव न घेता विद्यार्थ्यांनी प्रश्‍नपत्रिकांचा सराव करावा, महत्त्वाच्या प्रश्‍नांच्या नोट्‍स काढल्यास निश्‍चितपणे गुणांची टक्केवारी वाढण्यासाठी मदत होते.
10th, 12th
10th, 12thexam

सोलापूर : बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून १९ मार्च रोजी परीक्षा संपेल. दुसरीकडे इयत्ता दहावीची परीक्षा १ ते २६ मार्चपर्यंत सुरू असणार आहे. बोर्डाची परीक्षा म्हटले टेन्शन आणि ऐन परीक्षेच्यावेळी आजारी पडतात. त्याचा परिणाम गुणावर होतो आणि शेवटी हाती निराशाच लागते. त्यामुळे परीक्षेचा तणाव न घेता विद्यार्थ्यांनी मागील प्रश्‍नपत्रिकांचा सराव करावा आणि महत्त्वाच्या प्रश्‍नांच्या नोट्‍स काढल्यास निश्‍चितपणे त्याचा लाभ गुणांची टक्केवारी वाढण्यासाठी होतो.

इयत्ता दहावीतील गुणांच्या टक्केवारीतून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या महाविद्यालयात मोफत प्रवेश मिळतो. बारावीतील गुणांवरून पुढे नोकरीच्या दृष्टीने अभ्यासक्रमांची (मेडिकल, फार्मसीसह अन्य) निवड करण्याची संधी मिळते. नामांकित महाविद्यालयांमध्ये मोफत प्रवेश देखील मिळतो. त्यामुळे आजवर या दोन्ही वर्षांच्या टक्केवारीला फार महत्त्व आहे. या वर्षांतील मुलांकडून पालकांना मोठी आशा असते.

पालकांची अपेक्षा, शैक्षणिक प्रवेशाची स्पर्धा, नोकरीचे स्वप्न यातून बहुतेक विद्यार्थी तणावाखाली वावरताना पाहायला मिळतात. अनेक विद्यार्थी टक्केवारी कमी पडल्याने नैराश्याचे शिकार होतात. काहींनी आत्महत्येसारखी टोकाची पावले देखील उचलली आहेत. मात्र, परीक्षा व टक्केवारी म्हणजे आयुष्य नसून ‘अपयश ही यशाची पहिली पायरी’ समजून सर्वांनीच पुन्हा प्रयत्न केल्यास निश्चितपणे यश मिळते, असे अनेकांचे अनुभव आहेत.

मुलांनी लक्षात ठेवावी चतुःसूत्री.....

१) अभ्यासक्रमांची करावी उजळणी

ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी संपूर्ण अभ्यासक्रमाची उजळणी केली नाही किंवा उजळणीस सुरवात केलेली नाही त्यांनी निराश न होता आपल्या सुरू असलेल्या अभ्यासाबरोबरच पूर्वी शिकलेल्या अभ्यासक्रमाची उजळणी सुरू करावी. नियोजनाप्रमाणे उत्तरे लिहिण्याचा आणि वेळेत पेपर सोडविण्याचा प्रयत्न करा. बोर्डाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना आता परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका मिळत नाही. त्यामुळे प्रश्नपत्रिका मिळाल्यावर ज्या प्रश्नांची उत्तरे सहजपणे लिहिता येतील ते पहिल्यांदा लिहा. मुद्देसूद व अचूक उत्तरे लिहा.

------------------------------------------------

२) उत्तम वेळापत्रक तयार करा

योग्य नियोजनाशिवाय लक्ष्य गाठणे अशक्य असल्याने परीक्षेच्या अभ्यासाच्या तयारीकरिता स्वतःचे वेळापत्रक तयार करावे. प्रत्येक विषयास किती वेळ द्यावा हे निश्चित करा. अभ्यासाव्यतिरिक्त आपल्या आवडी, छंदही जोपासू शकता. त्यातून मानसिक स्वास्थ्य निरोगी राहील. सलग बराच वेळ अभ्यास करणे टाळा. ठरावीक वेळेनंतर ब्रेक घ्या. यामुळे ताण कमी होईल आणि पुढील अभ्यासाचा ताण वाटणार नाही. पहाटे लवकर उठून अभ्यास करावा. एका जागी बराच वेळ बसल्यामुळे शरीर आखडल्यासारखे होते, त्यासाठी हलका व्यायाम करा. मन शांत करण्याकरिता व्यायामासोबतच ध्यान जरुरी आहे.

-------------------------------------------------

३) स्वयंअध्ययनासाठी द्या पुरेसा वेळ

शाळेमध्ये शिकलेल्या विविध टॉपिक्सची घरी उजळणी करावी. स्वयंअध्ययनासाठी पुरेसा वेळ दिल्यास निश्चित केलेले ध्येय साध्य करण्यास मदत होईल. विविध विषयांच्या अभ्यासामध्ये आपल्या सोयीनुसार ३० ते ४० मिनिटांचा ब्रेक घ्या. स्वतःसाठी अभ्यासाची नियमावली बनवून सगळ्या विषयांना योग्य वेळ द्यावा. स्वतःच्या नोट्स तयार करा. परीक्षा जवळ आल्यानंतर नोट्ससाठी धावपळ होते, ही धावपळ टाळण्याकरिता आपण स्वतः तयार केलेल्या नोट्‌सचा मोठा फायदा होतो. ठरवलेल्या वेळापत्रकात शक्यतो बदल करू नका.

--------------------------------------------

४) मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा करा सराव

सर्व अभ्यासक्रम आणि उजळणी पूर्ण झाल्यानंतर, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवाव्यात. बोर्डाच्या जुन्या प्रश्नपत्रिका सोडविल्यामुळे प्रश्न कोणत्याप्रकारे विचारले जातात, कोणत्या धड्याला किती प्राधान्य आहे हे लक्षात येते. कोणत्या विषयात आपली तयारी पूर्ण झालेली आहे हे समजते. प्रत्येक विषयाच्या किमान चार ते पाच मागील प्रश्नपत्रिकांचा सराव करणे अपेक्षित आहे. दीर्घ प्रश्नांचे उत्तर नेमके व किती शब्दात लिहावे, कुठे थांबावे या बाबी समजून घ्याव्यात. उत्तरातील महत्त्वाच्या मुद्द्यांचे परिच्छेद करणे, नमुना प्रश्नपत्रिकांमधील दीर्घ उत्तरांच्या प्रश्नांचा सराव, लागणारा वेळ लक्षात ठेवून तसे नियोजन हवे. महत्त्वाच्या शब्दाखाली रेघ ओढल्यास लेखन अधिक आकर्षक दिसेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com