मुंबई - राज्यात दुष्काळाचा दाह सुरू असताना आज विधानसभेत विरोधकांनी सरकारवर टीकेचे आसूड ओढले. हा पावसाचा दुष्काळ असला, तरी सर्वांत मोठा अन्याय सरकारी धोरणं व सरकारी मानसिकतेनं केल्याचा आक्रमक हल्लाबोल विरोधकांनी केला. यामध्ये आमदार बच्चू कडू यांनी तर आक्रमक शैलीत सरकार व अधिकारी यांचा समाचार घेत उद्यापासूनच उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली.
लोकांनी रामराज्य मागितलं होतं, पण तुम्ही राममंदिरावरच भागवणार असाल, तर लोकं दुधखुळी नाहीत, अशा शब्दांत कडू यांनी सरकारवर प्रहार केला. हे सरकार शेतकरी-शेतमजूर व ग्रामीण जनतेविरोधात असल्याची टीका त्यांनी केली. ज्या केंद्रीय अधिकाऱ्याने दुष्काळाची नवी नियमावली तयार केली, त्याच्या कानाखाली जाऊन मारणार असल्याची धमकीच कडू यांनी या वेळी दिली. दरम्यान, अजित पवार यांनीही जलयुक्त शिवारचा दावा बोगस असून, या योजनेच्या यशाबाबत फेकूगिरी सुरू असल्याचा टोला लगावला. छगन भुजबळ यांनी उत्तर महाराष्ट्रातील नार-पार व दमणगंगा खोऱ्यातील राज्याच्या हक्काचे 50 टीएमसी पाणी गुजरातला दिल्याचा आरोप केला.
पाण्याची भीक मागतोय - खडसे
भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा सरकारला घरचा आहेर देत सरकारी अधिकाऱ्यांची मुजोरी व्यक्त केली. जळगाव जिल्ह्यात 81 गावांत पाणीटंचाई असतानाही लोडशेडिंगमुळे पाणी मिळत नाही. दुष्काळाच्या उपाययोजना अमलात आणण्यासाठी अधिकाऱ्यांची कमतरता आहे. अगोदर अधिकारी पदे भरा, तरच उपाययोजना होतील, असा दावा केला. या भागातील जनता पाण्यासाठी टाहो फोडत असून, मी सरकारकडे पाण्यासाठी भीक मागत आहे, अशा शब्दांत त्यांनी व्यथा मांडली.
|