अवघा महाराष्ट्र दुष्काळाच्या खाईत! 

अवघा महाराष्ट्र दुष्काळाच्या खाईत! 

मुंबई -  दुष्काळ आणि पाणीटंचाईचे सावट दूर करण्यासाठी राज्य सरकारने सत्तेवर आल्यानंतर "जलयुक्‍त शिवार'चा अभिनव कार्यक्रम राबवण्यास सुरवात केली. मात्र तरीही राज्यात आजमितीस पाणीबाणी जाहीर झाली असून, राज्यातील गावागावांत नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अवघा महाराष्ट्र दुष्काळाच्या खाईत सापडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

राज्यात सतत उद्‌भवणारी टंचाईची परिस्थिती विचारात घेऊन "सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र- 2019' अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान राज्य सरकारने हाती घेतले. 2014-15 मध्ये भूजल पातळीत दोन मीटरपेक्षा जास्त घट झालेल्या 188 तालुक्‍यांतील दोन हजार 234 गावांमध्ये, तसेच सरकारने टंचाई परिस्थिती जाहीर केलेल्या 22 जिल्ह्यांतील 19 हजार 59 गावांमध्ये हे अभियान प्राधान्याने राबविण्यात येत आहे. भविष्यात राज्याच्या उर्वरित भागात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यावरही भर दिला आहे. या अभियानात विविध विभागांकडील योजना, अशासकीय संस्था आणि लोकसहभाग यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. 

पाणलोट विकासाची कामे, साखळी सिमेंट नालाबांधाची खोलीकरण व रुंदीकरणाची कामे. जुन्या जलसंरचनांचे पुनरुज्जीवन, कोल्हापूर पद्धतीच्या व साठवण बंधाऱ्यांची दुरुस्ती, पाझर तलाव, लघुसिंचन तलाव दुरुस्ती, नूतनीकरण व क्षमता पुनर्स्थापित करणे, पाझर, गाव, साठवण, शिवकालीन, ब्रिटिशकालीन आणि निजामकालीन तलावातील माती व नालाबांधातील गाळ काढणे. मध्यम व मोठ्या प्रकल्पाच्या सिंचन क्षमतेनुसार प्रत्यक्ष वापर होण्यासाठी उपाययोजना करणे, छोटे ओढे-नाले जोड प्रकल्प राबविणे. विहीर/बोअरवेल पुनर्भरण, पिण्याच्या पाण्याचे स्रोत, तसेच पाणी वापर संस्थाचे बळकटीकरण, कालवा दुरुस्ती आदी कामे जलयुक्त शिवार योजनेच्या अंतर्गत सुरू करण्यात आली आहेत. 

जलयुक्‍त शिवार योजनेच्या कामांवर मागील साडेचार वर्षांत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. असे असले तरी राज्यातील 26 जिल्ह्यांमधील 151 तालुक्‍यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. सुमारे 12 हजारपेक्षा जास्त गावांत दुष्काळी परिस्थिती आहे. सध्या राज्यातील वाड्या- वस्त्या, गावांना टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे जलयुक्‍त शिवार योजनेच्या अंतर्गत झालेल्या कामांचा लाभ नेमका किती झाला, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

राज्यातील स्थिती (एप्रिल 2019 पर्यंतची) 
- दुष्काळ जाहीर केलेले तालुके - 151 
- पाणीटंचाई ग्रस्त गावे - 3,555 
- पाणीटंचाई ग्रस्त वाड्या - 8,183 
- पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरची संख्या - 4,594 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com