दुष्काळामुळे परीक्षा शुल्कमाफी, पण ‘या’ विद्यार्थ्यांनाच! सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ, तरीपण केवळ ८८१ विद्यार्थ्यांचीच शुल्क माफीसाठी नावे

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी मिळणार आहे. मात्र, जिल्ह्यातील परीक्षेसाठी बसलेल्या एक लाख १८ हजार ६१९ पैकी ८८१ विद्यार्थ्यांनाच शुल्क परत मिळणार आहे. त्यांची यादी माध्यमिक शिक्षण विभागाने पुणे बोर्डाला पाठविली आहे.
sakal exclusive
sakal exclusivesakal

सोलापूर : जिल्ह्यातील करमाळा, बार्शी, माढा, माळशिरस, सांगोला या पाच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून उर्वरित तालुक्यांमधील बहुतेक महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश स्थिती जाहीर झाली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी मिळणार आहे. मात्र, जिल्ह्यातील दहावी-बारावी परीक्षेसाठी बसलेल्या एक लाख १८ हजार ६१९ पैकी केवळ ८८१ विद्यार्थ्यांनाच शुल्क परत मिळणार आहे. त्यांची यादी माध्यमिक शिक्षण विभागाने पुणे बोर्डाला पाठविली आहे.

राज्यातील दुष्काळामुळे राज्य शासनाने दहावी- बारावीतील विद्यार्थ्यांचे (दुष्काळग्रस्त तालुक्यातील) परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता २० मार्चपर्यंत पात्र विद्यार्थ्यांची यादी बोर्डाला सादर करण्याचे आदेश सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे केवळ अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांनाच परीक्षा शुल्क परत मिळणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात इयत्ता बारावीसाठी ५२ हजार ८७० तर दहावीसाठी ६५ हजार ७४९ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले आहेत. जिल्ह्यातील पाच तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला असून इतर तालुक्यातील बऱ्याच महसूल मंडळांमध्ये देखील दुष्काळसदृश स्थिती जाहीर झाल्याने त्या सर्वांनाच शासनाच्या सवलतींचा लाभ देण्यात येत आहे. मात्र, परीक्षा शुल्क माफीस केवळ दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यातील विद्यार्थीच पात्र असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुख्याध्यापकांना पुन्हा पत्र पाठवून माहिती मागविली जाईल

जिल्ह्यातील ८८१ विद्यार्थ्यांची यादी प्राप्त झाली असून ती माहिती पुणे बोर्डाला सादर केली आहे. तरीपण, कोणीही विद्यार्थी या लाभापासून वंचित राहू नये म्हणून सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पुन्हा एकदा पत्र देऊन माहिती घेतली जाईल. कोणी विद्यार्थी वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापकांची राहील.

- सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

अनुदानित शाळांमधील विद्यार्थीच पात्र

दुष्काळामुळे इयत्ता दहावी- बारावीतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफीचा निर्णय झाला, पण दुष्काळसदृश भागातील विद्यार्थी त्यासाठी पात्र नाहीत. दुसरीकडे अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांनाच परीक्षा शुल्क परत मिळणार आहे. सध्या त्यांचे बॅंक खाते क्रमांकासह इतर माहिती बोर्डाने मागविली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार जिल्ह्यातील मुख्याध्यापकांनी केवळ ८८१ विद्यार्थ्यांची माहिती पाठविली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com