मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे (Maharashtra state exam council) पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा कधी होणार, असा सवाल शिक्षण क्रांती संघटनेने केला आहे, तसेच नियोजन करून परीक्षेचा कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी शिक्षण आयुक्तांकडे केली आहे. परिषदेने यंदा शिष्यवृत्ती परीक्षांची (scholarship exam) तारीख २० फेब्रुवारीला जाहीर केली होती, परंतु ही तारीख पुढे ढकलून सुधारित वेळापत्रक (timetable) नंतर जाहीर केले जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती.
मात्र अद्यापही कोणतीही घोषणा झाली नसून परीक्षेची तयारी करणारे लाखो विद्यार्थी संभ्रमात असल्याचे संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस यांनी सांगितले. राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या लेखी परीक्षा सुरू असून १५ मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत, त्यानंतर लगेचच पहिली ते नववी, अकरावी या वर्गाच्या परीक्षा सुरू होतात.
त्यानंतर लगेच शाळांना उन्हाळी सुट्टी सुरू होते. या सुट्टीच्या काळात विद्यार्थी अभ्यास करण्याच्या मानसिकतेत नसतात. या बालमानसिकतेचा विचार करून उन्हाळी सुट्टीच्या अगोदरच या दोन्ही शिष्यवृत्ती परीक्षा घ्याव्यात. याकरीता तातडीने परीक्षेची तारीख जाहीर करावी जेणेकरून विद्यार्थी पूर्वतयारी करू शकतील, अशी मागणी घागस यांनी केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.