
शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दोनच मंत्री शिंदे-फडणवीस सरकारमध्ये असल्यानं त्यांच्यावर टीका होत होती. मात्र, आता मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion 2022) पार पडला असून यामध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या अनेक आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतलीय.
यामध्ये दीपक केसरकर, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील यांचा समावेश आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार शिंदे गटाच्या आमदारांनी बंड केल्यानंतर पडलं. त्यानंतर शिंदे गटाकडे एक-एक आमदार फुटून गेले. यावरुन या आमदारांना विशेष ऑफर म्हणजेच मंत्रीपदाची ऑफर दिल्याचंही बोलल्या गेलं. तेव्हापासून मंत्रीपदाची चर्चा आहे. कुणाला कोणतं मंत्रीपद मिळणार, कुणाला राज्यमंत्रीपद, कुणाला कॅबिनेट मंत्रीपद मिळणार, याचीची चर्चा रंगली होती. आजअखेर यावर पूर्णविराम लागला असून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आमदारांना मानाचं स्थान मिळालंय.
आज राज्याचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. त्यात भाजपाचे ९ आणि शिंदे गटाच्या ९ जणांना संधी देण्यात आलीय. भाजपाकडून देशातील श्रीमंत बांधकाम व्यावसायिक म्हणून ओळखले जाणारे मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांना संधी देण्यात आलीय. तसेच राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil), सुधीर मुनगुंटीवार, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), विजयकुमार गावित, गिरीश महाजन यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतलीय.
देशातील सर्वात श्रीमंत बांधकाम व्यावसायिकाला भाजपनं मंत्रिमंडळात मानाचं स्थान दिलं आहे. मंगलप्रभात लोढा हे स्वातंत्र्य सैनिक आणि निवृत्त न्यायाधीश गुमान माल लोढा यांचे सुपूत्र असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम सुरू केलंय. मलबार हिल मतदारसंघाचे ते भाजपा आमदार आहेत. १९९५ पासून सलग ते या मतदारसंघातून निवडून येत आहेत. देशातील नामवंत श्रीमंत बिल्डरांमध्ये लोढा यांचं नाव घेतलं जातं. लोढा यांनी राजस्थानात एलएलबीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर वकिली सुरू केली. परंतु, न्यायालयात वडील न्यायाधीश असल्यानं त्यांनी वकिली सोडत थेट मुंबईत गाठली.
दरम्यान, १९८२ मध्ये एका मित्राच्या मदतीनं नालासोपारा इथे जमीन खरेदीविक्रीचा व्यवसाय सुरू केला आणि याच व्यवसायात त्यांनी जम बसवला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून भाजपापर्यंत त्यांचा राजकीय प्रवास घडला. १९९५ मध्ये मलबार हिल मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. तेव्हा तत्कालीन नगरविकास मंत्री बी.एस देसाई यांचा पराभव केला होता.