निवडणुकीपूर्वी पेच! ३८४ पेक्षा अधिक उमेदवार असल्यास काय करावे? निवडणूक आयोगाकडून मागविले मार्गदर्शन; भरमसाठ पोलिंग एजंट बसवायचे कोठे, अधिकारी चिंतेत

सध्याच्या एका कंट्रोल युनिटवर २४ ईव्हीएम बसू शकतात एवढी त्याची क्षमता आहे. एका ईव्हीएमवर १६ उमेदवार मावतात, याप्रमाणे एका लोकसभा मतदारसंघातून ३८४ उमेदवार निवडणूक लढत असल्यास अडचण येणार नाही. पण, त्यापेक्षा अधिक उमेदवार असल्यास ईव्हीएमवर मतदान घेणे कठीण होवू शकते.
election
electionsakal

सोलापूर : सध्याच्या एका कंट्रोल युनिटवर २४ ईव्हीएम बसू शकतात एवढी त्याची क्षमता आहे. एका ईव्हीएमवर १६ उमेदवार मावतात, याप्रमाणे एका लोकसभा मतदारसंघातून ३८४ उमेदवार निवडणूक लढत असल्यास अडचण येणार नाही. पण, त्यापेक्षा अधिक उमेदवार असल्यास ईव्हीएमवर मतदान घेणे कठीण होवू शकते. त्यामुळे अशावेळी काय करावे, यासंदर्भातील मार्गदर्शन उपजिल्हा निवडणूक अधिकारी आता निवडणूक आयोगाकडून मागवीत आहेत. दुसरीकडे मुक्त चिन्हांचाही प्रश्न निर्माण होणार आहे.

मराठा समाजाने आता प्रत्येक गावातून किमान एक-दोन उमेदवार देण्याचा निर्णय जाहीर केला असून प्रत्येक लोकसभा मतदारसंघात किमान ५०० ते ६०० गावे आहेत. त्यामुळे मराठा समाजाने जाहीर केल्याप्रमाणे उमेदवारांची संख्या त्या प्रमाणात राहिल्यास ईव्हीएमवर निवडणूक घेण्यास अडचणी निर्माण होवू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघ राखीव असून माढा, धाराशिव लोकसभा मतदारसंघ खुला आहे. सोलापूर मतदारसंघातून प्रत्येक गावातील दोन मागासवर्गीय उमेदवार तयार केले जात असून त्यांची अनामत रक्कम (डिपॉझिट) लोकवर्गणीतून भरण्याचीही तयारी केली जात आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक पेच निर्माण होण्याची शक्यता सध्यातरी दिसत आहे.

प्रत्येक गावातून एक-दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

मराठा समाजाला सरकारने फसवे १० टक्के आरक्षण दिले. समाजासाठी नि:स्वार्थी नेतृत्व पुढे येत असताना त्यांची ‘एसआयटी’ लावली आणि त्याला सभागृहात बहुतेक आमदारांनी सहमती दिली. या बाबींचा निषेध म्हणून आम्हीच मतदार, आम्हीच उमेदवार अन् आम्हीच खासदार म्हणून प्रत्येक मतदारसंघातील प्रत्येक गावातून एक ते दोन उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात असतील.

- माऊली पवार, समन्वयक, सकल मराठा समाज

--------------------------------------------------------------------------------------------

निवडणूक आयोगाकडून मागविले जाणार मार्गदर्शन

एका लोकसभा मतदारसंघात ईव्हीएमच्या क्षमतेपेक्षा अधिक उमेदवार असल्यास काय करावे, यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मागविले जात आहे. त्यांच्याकडून स्पष्ट सूचना, निर्देश आल्यानंतर त्यानुसार त्या त्यावेळी निर्णय घेतला जाईल.

- गणेश निऱ्हाळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर

मुक्त चिन्ह अन् पोलिंग एजंटांचा प्रश्न

सध्या निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्ष वगळता १९२ मुक्त चिन्ह आहेत. आता उमेदवारांची संख्या त्याहून अधिक असल्यास आयोगाला ऐनवेळी चिन्हांमध्ये वाढ करावी लागणार आहे. त्यामुळे आयोगाचे संपूर्ण लक्ष लोकसभेसाठी नेमके किती उमेदवार असतील, याकडे असणार आहे. दुसरीकडे एका उमेदवारासाठी एक पोलिंग एजंट असतो आणि साडेचारशे-पाचशे उमेदवार असल्यास त्या पोलिंग एजंटांची बैठक व्यवस्था करायची कोठे, हा देखील मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

सूचक-अनुमोदक त्याच मतदारसंघातील आवश्‍यक

ज्या लोकसभा मतदारसंघातून उमेदवार अर्ज दाखल करणार आहे, त्याच मतदारसंघातील सूचक-अनुमोदक लागतील. करमाळ्यातील जवळपास ५० तरुण सोलापूर लोकसभा लढविण्याची तयारी करीत आहेत. त्यांची सोमवारी (ता. ११) बैठक देखील झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, खुल्या मतदारसंघातून प्रत्येक उमेदवाराला २५ हजार तर राखीव मतदारसंघातील उमेदवारास १२ हजार ५०० रुपयांची अनामत रक्कम भरावी लागेल. झालेल्या एकूण मतदानापैकी किमान १० टक्के मतदान पडलेल्या उमेदवारांना अनामत रक्कम परत मिळेल, असे अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com