पाऊस लांबला तरी, आताच पेरण्या करू नका - कृषीमंत्री दादा भुसे

राज्यात पाऊस लांबल्याने खरीपाच्या पेरण्या काही अशी लांबणीवर पडणार आहेत.
Dada Bhuse
Dada Bhuseesakal
Summary

राज्यात पाऊस लांबल्याने खरीपाच्या पेरण्या काही अशी लांबणीवर पडणार आहेत.

पुणे - राज्यात पाऊस लांबल्याने खरीपाच्या पेरण्या काही अशी लांबणीवर पडणार आहेत. राज्यातील खरीपाच्या पेरण्यांसाठी बियाणे आणि रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. परंतु पाऊस लांबला तरी, शेतकऱ्यांना आताच खरीपाच्या पेरण्यांची घाई करू नये. पिकांच्या पेरण्यायोग्य पाऊस पडल्यानंतरच पेरण्या कराव्यात, असे आवाहन राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

खरीप हंगामातील पेरण्यासाठी ३० जूनपर्यंतचा कालावधी योग्य असतो. त्यामुळे या हंगामातील पिकांच्या पेरण्या लांबल्या म्हणता येणार नाहीत. येत्या आठवडाभरात पाऊस पडल्यास, त्या वेळेवरच होतील, असेही भुसे यांनी यावेळी स्पष्ट केले. कृषी मंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पुण्यात महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची १०७ वी बैठक झाली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

भुसे पुढे म्हणाले, ‘कृषी विभागाच्यावतीने हवामान खात्याकडील मान्सूनबाबतचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांना वेळोवेळी पेरणीबाबत मार्गदर्शन केले जाते. यानुसार यंदाच्या पावसाळ्यात किमान ९७ तर, कमाल १०५ टक्क्यांपर्यंत पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. हा पाऊससुद्धा वेळेपूर्वी म्हणजेच खरिपाचा हंगाम सुरु होण्यापूर्वीच येईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही. या पार्श्‍वभूमीवर पुरेशा प्रमाणात पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये. खरीपाच्या पेरण्यांसाठी बियाणे, रासायनिक खते आदींबाबत वेळोवेळी आढावा घेऊन, त्याबाबत नियोजन केले जात आहे. राज्यात खरीप हंगामात सोयाबीन व कापूस या दोन पिकांची सुमारे ६० टक्के क्षेत्रात लागवड केली जाते. या पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी उत्तम मॉडेल तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शेतकरी केंद्रबिंदू मानून, त्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कृषी विभाग काम करीत आहे.’

‘गतवर्षीच्या तुलनेत निम्म्याच पेरण्या’

राज्यात गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात १५ जूनपर्यंत तीन टक्के खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदाच्या खरीप हंगामात या तारखेपर्यंत केवळ दीड टक्का खरीप पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. परिणामी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निम्म्याच पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. यामुळे खरीप हंगामातील बियाणे आणि रासायनिक खतांचा पुरेसा साठा शिल्लक राहिला असल्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितले.

‘शेतकऱ्यांशी संवाद साधणार’

राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचा १ जुलै हा जन्मदिन दरवर्षी कृषिदिन म्हणून साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून कृषिदिन हा केवळ एका दिवसांपुरता साजरा न करता, तो आठवडाभर साजरा केला जातो. यानुसार दरवर्षी २४ ते १ जुलै हा आठवडा कृषी सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे. यंदाच्या या कृषी सप्ताहात कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. या संवाद कार्यक्रमात पाऊस, खरीप पेरण्या आदींबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी कृषी विभागाचे अधिकारी गाव पातळीवर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com