सोलापूर - गणेशोत्सव पाहण्यासाठी मुंबई, कोकण, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद यासह अन्य प्रमुख शहरांमध्ये येणाऱ्या प्रवाशांसाठी राज्य परिवहन विभागाने नियोजन केले आहे. त्यानुसार तीन हजार 875 एसटी गाड्या 10 ते 12 सप्टेंबर आणि 13 ते 30 सप्टेंबर अशा दोन टप्प्यात धावणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी सुमारे 430 प्रवासी मित्रांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना उत्तम सुविधा मिळावी, यासाठी एसटी महामंडळाने 31 विभाग व 251 आगारांमधून वाहतुकीचे नियोजन केले आहे. तसेच रेल्वेने जाणाऱ्यांसाठीही रेल्वे स्थानकापासून एसटी गाड्या सज्ज ठेवल्या जाणार आहेत.
असे आहे नियोजन!
मुंबई-कोकण 2100 एसटी बसेस
पुणे- कोल्हापूर 275 बसेस
औरंगाबाद- मराठवाडा 1500 बसेस
एकूण एसटी गाड्या 3,875
गणेशोत्सव हा भारतीयांच्या आनंदाचा उत्सव आहे. 13 ते 30 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील भक्तगण गणपती व देखावे पाहण्याकरिता ठिकठिकाणी ये-जा करतात. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी सेवा देणाऱ्या एसटी गाड्यांचे नुकसान होऊ नये, याची दक्षता सर्वांनी घेण्याची गरज आहे.
- दिवाकर रावते, परिवहन मंत्री
परतीचा प्रवास खडतरच
यावर्षी गणेशोत्सव कालावधीत राज्य परिवहन विभागाने सुमारे चार हजार एसटी बसेस सज्ज ठेवल्या आहेत. गणेशोत्सव पाहण्यासाठी राज्यभरातून अधिकाधिक नागरिक कोकण, मुंबई, कोल्हापूर, पुणे याठिकाणी जातात. परंतु, त्याठिकाणाहून परतणाऱ्या एसटी गाड्यांना तोटाच सहन करावा लागतो. किलोमीटरच्या तुलनेत उत्पन्न निम्म्याने कमी असते, असे राज्य परिवहनच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
|