शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नववर्षात ‘महावितरण’ देणार दिवसा वीज; सौर प्रकल्पांसाठी मिळाली १०००० एकर जमीन; शेतकऱ्यांना एकरी ५०,००० भाडे

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत आगामी वर्षात शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी योजनेंतर्गत कृषीबहुल भागात दोन ते दहा मेगावॉट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प (पाच किलोमीटर सबस्टेशनच्या अंतरात) कार्यान्वित केले जाणार आहेत.
solar agricultural pump.jpg
solar agricultural pump.jpgsakal

सोलापूर : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत आगामी वर्षात शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी योजनेंतर्गत कृषीबहुल भागात दोन ते दहा मेगावॉट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प (पाच किलोमीटर सबस्टेशनच्या अंतरात) कार्यान्वित केले जाणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील २६७ पैकी २३९ सबस्टेशनअंतर्गत असे प्रकल्प उभारले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात २०६९ एकरवरील गायरान जमिनीवर सौर प्रकल्प उभारले जातील.

कृषिप्रधान देशात अजूनही शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण क्षमतेने वीज मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ही ऐतिहासिक योजना राज्य सरकारने जाहीर केली. त्यासाठी गायरान व शेतकऱ्यांच्या खासगी जमिनी घेऊन या प्रकल्पांची उभारणी केली जाणार आहे. एका ठिकाणी किमान चार एकर जमीन आवश्यक असून त्या जागेवर एक मेगावॉट सौर प्रकल्प बसविला जाईल.

दहा एकर जमिनीवर दोन ते पाच मेगावॉटपर्यंत प्रकल्प उभारला जाऊ शकतो. सोलापूर जिल्ह्यात सुरवातीला दोन हजार ६९ एकर गायरान जमिनीवर सौर प्रकल्पांची उभारणी होणार आहे. त्यातून अंदाजे ५० हजाराहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल, असा विश्वास ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांना आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांसाठी योजनेतून सौर प्रकल्प उभारले जातील.

सबस्टेशनचे सक्षमीकरण युद्धपातळीवर

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सध्या गायरान जमिनीवर सौरऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. तत्पूर्वी, ‘महावितरण’च्या तारांमधून केवळ वीज ग्राहकांसाठी जात होती. वीज निर्मिती प्रकल्पातून तारांद्वारे ३३ केव्ही वीज यायची आणि ११ केव्हीने जात होती. आता पहिल्यांदाच त्या तारांमधून सबस्टेशनवर सौर प्रकल्पातून तयार होणारी वीज येणार आहे. त्यामुळे पूर्वीच्या यंत्रणेत बदल करून येणारी वीज शेतकऱ्यांना पुरवठा व्हावी, यादृष्टीने यंत्रणेचे सक्षमीकरण युद्धपातळीवर केले जात आहे. डिसेंबर २०२५पर्यंत राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचे उद्दिष्ट आहे.

शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपयांचे भाडे

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत गायरान व खासगी जमिनी घेऊन त्यावर सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी केली जात आहे. खासगी शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी जमीन दिल्यास त्यांना वार्षिक एकरी ५० हजार रुपये (प्रतिहेक्‍टरी एक लाख २५ हजार) भाडे मिळणार आहे. पण, योजनेच्या अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यास त्याची जमीन १५ वर्षांसाठी सरकारला भाड्याने द्यावी लागेल. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील ८ हजार एकर जमीन या प्रकल्पांसाठी द्यायला तयारी दर्शविली असून तसे अर्ज त्यांनी ‘महावितरण’कडे केले आहेत. आता सुरवातीला गरजेच्या ठिकाणच्या जमिनी भाड्याने घेतल्या जाणार आहेत.

सोलापूर जिल्ह्याची स्थिती

  • एकूण सबस्टेशन

  • २६७

  • सौर प्रकल्प बसणारे सबस्टेशन

  • २३९

  • प्रकल्पासाठी गायरान जमीन

  • २०६९ एकर

  • शंभर टक्के गायरान जमीन

  • २९ सबस्टेशन

  • ३० ते ८० टक्के गायरान जमीन

  • ५० सबस्टेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com