शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! उजनीतून शेतीला सुटणार सलग ४० दिवस पाणी; १ नोव्हेंबरपासून पहिले, जानेवारीत सुटणार दुसरे आवर्तन

उजनीत सध्या ५८ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. यंदाच्या पावसाळ्यात धरण ६६ टक्क्यांपर्यंतच भरले असून शेतीसाठी पहिले आवर्तन १ नोव्हेंबरपासून सोडले जाणार आहे. सलग ४० दिवस शेतीला पाणी सोडल्यानंतर पुन्हा जानेवारीत शेवटचे आवर्तन सोडले जाईल.
'उजनी'
'उजनी'Canva

सोलापूर : सोलापूरसह पुणे व नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनीत सध्या ५८ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. यंदाच्या पावसाळ्यात धरण ६६ टक्क्यांपर्यंतच भरले असून शेतीसाठी पहिले आवर्तन १ नोव्हेंबरपासून सोडले जाणार आहे. सलग ४० दिवस शेतीला पाणी सोडल्यानंतर पुन्हा जानेवारीत शेवटचे आवर्तन सोडले जाईल. त्यानंतर सर्व पाणी पिण्यासाठीच राखीव ठेवले जाणार असल्याची माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

खरीप हंगामात पावसाळा सुरु असतानाही जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस व सांगोला हे पाच तालुके दुष्काळाच्या यादीत समाविष्ट झाले आहेत. त्यावेळी पिकांसाठी पाणी सोडण्याची मागणी झाली, पण उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा ३३ टक्क्यांपेक्षा कमी असल्याने पाणी सोडता आले नाही. आता रब्बी पिकांसाठी उजनीतून दोन आवर्तने सोडली जाणार आहेत.

१ नोव्हेंबर ते १० डिसेंबरपर्यंत पहिले आवर्तन सुटेल आणि त्यासाठी किमान ८ टीएमसी पाणी लागेल, असा अंदाज आहे. सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडल्यानंतर पुन्हा कॅनॉलमधून शेतीला पाणी सोडण्यास अडचणी येतात. त्यामुळे एक महिन्याच्या अंतराने दुसरे आवर्तन शेतीसाठी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यापर्यंत सोलापूर शहरासाठी किमान तीनवेळा भीमा नदीतून पाणी सोडावे लागणार आहे. त्यासाठी अंदाजे १८ टीएमसी (३६ टक्के) पाणी लागणार आहे.

जिल्ह्यात टॅंकर सुरु होतील, अशी स्थिती

उजनी धरणात १५ ते १८ टीएमसी गाळ आहे. सध्या उजनीतील एकूण पाणीसाठा ९५ टीएमसी असून त्यातील गाळ वगळता उजनीत सध्या ८० टीएमसीपर्यंतच पाणी आहे. बाष्पीभवनातून आठ टीएमसी पाणी उडून जाते. धाराशिव, कर्जत-जामखेड, इंदापूर, बारामतीसह काही एमआयडीसी व सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषदा, ग्रामपंचायतींनाही उजनीचाच आधार आहे. त्यासाठी अंदाजे २० टीएमसी पाणी लागते.

सोलापूर शहरासाठी तीन आवर्तनातून १८ टीएमसी तर शेतीच्या दुसऱ्या आवर्तनाला सात ते आठ टीएमसी पाणी लागेल. एकूण ५५ टीएमसी पाणी एप्रिल-मेपर्यंत सोडले जाईल. त्यानंतर गाळ वगळून राहिलेले १२ ते १५ टीएमसी पाणी पावसाळा सुरु होईपर्यंत ठेवावे लागेल. या पार्श्वभूमीवर एप्रिल-मे महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाण्यासाठी टॅंकर सुरु होतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com