
सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
Aurangabad News : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आहेत. कालपासून एकनाथ शिंदेंचा दोन दिवसीय औरंगाबाद दौरा सुरुय. आज शिंदेंनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलंय.
शिंदे पुढं म्हणाले, मराठवाड्याचा आढावा घेतला असून दुष्काळाची माहिती घेतली. घराचं नुकसान, पंचनामे, शेतीचं नुकसान आदींची माहिती घेतलीय. हे युतीचं सरकार आहे. ते शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाहीय. शेतकऱ्यांना मदत करण्याचा धोरणात्मक निर्णय कॅबिनेटमध्ये घेऊ. या जिल्ह्यात (औरंगाबाद) पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, तो आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतोय. वेरूळ कृष्णेश्वराच्या विकासाची मागणी आली होती. नांदेड शहराच्या रस्त्याचा प्रस्तावही आला होता. हे प्रश्न आम्ही लवकरात-लवकर सोडविणार आहोत.
परभणीतील समांतर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणार आहे. नांदेड-जालना एक समृद्धी हायवे करणार आहोत. नांदेडातील भूमिगत गटार योजना मंजूर करू. लातूरचं जिल्हा सामान्य रुग्णालय आहे, त्यासाठी मोफत जमीन देण्याच्या अडचणी दूर करू. घाटी रुग्णालयाचं खासगीकरण करणार नाही याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे, असंही शिंदेंनी यावेळी स्पष्ट केलं.