
मुंबई : यावर्षी लिंबाच्या भावाने शिखर गाठलं आहे. भारतातील वेगवेगळ्या भागात लिंबाचे भाव २०० ते ३०० रुपये प्रतिकिलो झाले असल्याने सध्या लिंबावर आधारित व्यवसायावर त्याचा परिणाम झाला आहे. लिंबानंतर आता मिरचीच्या भावतही वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहेत. मागच्या पाच महिन्यात महाराष्ट्रातील बाजारपेठेत मिरचीचे दर पाच पटीने वाढले आहेत.
डिसेंबर २०२१ मध्ये मिरचीचे दर हे २० ते ४० रुपयांच्या दरम्यान होते. पण हे भाव आता ६० ते ८० च्या घरात पोहोचले आहेत. काही भागात हे दर १०० रुपयांपर्यंत पोहोचले असून त्यामुळे आता ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. सध्या देशभरात गॅस, पेट्रोल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईमुळे लोकांना फटका बसत असताना शेतकऱ्यांच्या मिरचीचेही भाव वाढल्याने ग्राहकांवर अतिरिक्त भार पडणार आहे. मिरचीच्या भावात वाढ झाल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत पण मिरची पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनाही मिरची शेतीतून बऱ्यापैकी फायदा होताना दिसत आहे. काही ठिकाणी खराब वातावरणामुळे शेतकऱ्यांना नुकसानही सहन करावे लागत आहे.
सन २००१-०२ च्या दरम्यान महाराष्ट्रात मिरचीचे उत्पादन हे १०६९००० टन इतके होते ते वाढून आता २०९२००० टन इतके झाले आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मिरची उत्पादक देश असून जगातील सर्वांत मोठा निर्यातदार आहे. मागच्या वर्षी भारताने ८४०० कोटी रुपयांच्या मिरचीची निर्यात केली होती. त्यामुळे उत्पादनात वृद्धी झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील आणि तेलंगनामधील काही शेतकऱ्यांच्या मिरचीवर पडलेल्या रोगामुळे ९ लाख एकरच्या मिरचीचे नुकसान झाले होते. महाराष्ट्रातही काही जिल्ह्यात रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सध्या मिरचीच्या भावात वाढ झाल्याचं सांगितलं जातंय. त्याचबरोबर पेट्रोलचे वाढते भाव मिरचीच्या भावासाठी कारणीभूत आहेत. त्याबरोबरच व्यापारी शेतकऱ्यांकडून ६० ते ७० रुपये प्रतिकिलो प्रमाणे मिरची विकत घेतात आणि ग्राहकांना १२० रुपये प्रमाणे विकतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होते.
महाराष्ट्रातील काही औरंगाबाद, सोलापूर आणि पुणे येथील बाजारपेठेत डिसेंबर २०२१ मध्ये १९००, २७०० आणि २००० रुपये प्रतिक्विंटल भाव होता. तर हे भाव वाढून आता २३ एप्रिल रोजी सोलापूरमध्ये ६५००, पुणे ६००० आणि कोल्हापूरमध्ये ८००० रुपये प्रतिक्विंटल इतके झाले. हिरव्या मिरचीची आवक कमी असल्याने भाव वाढले असल्याचं चित्र सध्या पहायला मिळत आहे.
तसेच महाराष्ट्र स्टेट बोर्ड एग्रीकल्चर बोर्डच्या रिपोर्टनुसार २ एप्रिलला साताऱ्यातील वाई मार्केटमध्ये हिरव्या मिरचीचे भाव किमान ५००० ते कमाल ७००० रुपये असल्याचं सांगितलं आहे. तसेच रत्नागिरीमध्ये किमान ६००० तर कमाल ७००० रुपये प्रतिक्विंटल भाव होते. कोल्हापूरात मिरचीचा भाव हा ८००० रुपये प्रतिक्विंटल इतका होता. २० एप्रिलला धुळे मार्केटमध्ये मिरचीला विक्रमी भाव मिळाला असून १५००० रुपये प्रतिक्विंटल दराने मिरचीची विक्री झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.