

तात्या लांडगे
सोलापूर : जिल्ह्यातील सात लाख ९८ हजार ९१० शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीचा व पुराचा फटका बसला. त्यांच्यासाठी शासनाने ८६८ कोटी रुपयांची मदत दिली. आतापर्यंत जिल्ह्यातील चार लाख ९० हजार ९१० शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा आहे. ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, त्यांना मदत मिळायला १५ ते २० दिवस लागतील, अशी स्थिती आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माढा, बार्शी, करमाळा, मोहोळ, उत्तर सोलापूर या तालुक्यांना पुराचा मोठा फटका बसला. तर उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. त्यांच्यासाठी शासनाने पंचनामे अहवाल प्राप्त होताच मदतीची रक्कम दिली. पण, याद्या वेळेत अपलोड झाल्या नाहीत, दुसरीकडे अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी देखील काढलेला नाही. त्यामुळे पाच लाखांपर्यंत शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
आता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशानुसार प्रत्येक तालुक्यातील तलाठी, तहसीलदारांकडून ज्या शेतकऱ्यांनी नव्याने फार्मर आयडीसाठी अर्ज केले, त्यास ॲप्रुवल देत आहेत. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना पुढील १५ दिवसांत मदत मिळेल, असेही अधिकारी सांगतात. आतापर्यंत पाच लाख २२ हजार शेतकऱ्यांची यादी ॲप्रुवल झाल्याने त्यांना याच आठवड्यात ६४२ कोटी रुपयांची भरपाई मिळेल. त्यापैकी तीन लाख आठ हजार शेतकऱ्यांना ३६९ कोटी ७७ लाख रुपये मिळाले आहेत.
अतिवृष्टीच्या भरपाईची स्थिती
बाधित शेतकरी
७,९८,९१०
शासनाकडून मिळालेली भरपाई
८६८ कोटी
मदत मिळालेले शेतकरी
३,०८,०००
मदत न मिळालेले शेतकरी
४,९०,९१०
फार्मर आयडी काढून घेण्याचे आवाहन
ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीची भरपाई मिळालेली नाही, त्यांनी तातडीने गावातील महा- ई-सेवा केंद्रात जाऊन तातडीने फार्मर आयडी काढून घ्यावा. ज्या शेतकऱ्याचा फार्मर आयडी तयार झाला, त्यास मान्यता (ॲप्रुवल) देण्याची कार्यवाही सुरू आहे. तलाठ्याकडून ॲप्रुवल मिळाल्यावर तहसील कार्यालयातून शेवटचे ॲप्रुवल मिळते. त्यानंतर त्या शेतकऱ्याचा फार्मर आयडी तयार होतो. त्यानंतर त्या शेतकऱ्याला अतिवृष्टीची मदत जमा होईल, असे तहसील कार्यालयांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
रब्बी पेरणीसाठीही हेक्टरी २० हजार रुपये
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी मदतीचे वाटप सुरू आहे. आता रब्बी हंगामात पेरणीसाठी राज्य शासनाने सोलापूर जिल्ह्यास ६५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. जिल्ह्यात ७ लाख ८२ हजार १२७ शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार (३ हेक्टरपर्यंत) रुपये मिळणार आहेत. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात महापूर व अतिवृष्टीमुळे ७ लाख ८२ हजार १२७ शेतकऱ्यांचे ६ लाख ५२ हजार ६५ हेक्टवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना भरपाई वाटप केली. रब्बी हंगामासाठी या शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये (तीन हेक्टरच्या मर्यादेत) देण्यात येणार आहेत. प्रत्येक तहसीलदार व जिल्हाधिकारी यांनी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.