'शाळांमध्ये हिंदू मुलींनी टिकली लावली, हातात किंवा गळ्यात दोरा बांधला तर अडवणूक होते. इतर धर्माची अडवणूक होत नाही.'
कोल्हापूर : तिरंग्याइतकेच (Tiranga) भगव्याचे महत्त्व आहे. त्यामुळे १५ ऑगस्टला तिरंग्याशेजारी आता भगवा ध्वजही (Saffron Flag) उभारण्यात यावा, असे धक्कादायक आवाहन हिंदू एकता आंदोलन समितीचे नेते तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी विक्रम पावसकर (Vikram Pavaskar) यांनी केले.
पावसकर यांच्या या आवाहनामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. विक्रम पावसकर हे कोल्हापूरमध्ये बोलत होते. दरम्यान, अशाच प्रकारचे विधान यापूर्वी संभाजी भिडे यांनीही केले होते. त्यात आता पावसकर यांनीही तीच मागणी केल्याने स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नव्याने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पावसकर हे कऱ्हाड नगरपालिकेचे माजी नगरसेवक आहेत. हिंदू एकता आंदोलनासाठी ते काम करतात. विशाळगड येथील अतिक्रमण काढण्यासाठी ते कायम पाठपुरावा करत आलेले आहेत. पावसकर म्हणाले, ‘‘पूर्वजांपासून भगवा ध्वज लावण्याची परंपरा आहे. हिंदुस्थानातील अनेक राजे-महाराजेही भगवा ध्वज लावत होते. त्यामुळे या ध्वजाला मोठे महत्त्व आहे.
त्यामुळे तिरंग्याशेजारी हा भगवा ध्वजही लावण्यात यावा. शाळांमध्ये हिंदू मुलींनी टिकली लावली, हातात किंवा गळ्यात दोरा बांधला तर अडवणूक होते. इतर धर्माची अडवणूक होत नाही. हिंदू मुले ही आमची धार्मिकता जपण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे त्यांची अडवणूक आम्ही खपवून घेणार नाही. वेळप्रसंगी आम्ही त्यासाठी रस्त्यावर उतरू, असा इशाराही पावसकर यांनी दिला.
लव्ह जिहादविरोधात महाराष्ट्रात कडक कायदा करावा, अशी आमची मागणी असल्याचे सांगून पावसकर म्हणाले, ‘‘सध्याचे सरकार त्या दृष्टीने काम करत आहे. लव्ह जिहादविरोधात कायदा तयार करण्यासाठी सात जणांची समिती तयार करण्यात आलेली आहे. तीन ते चार राज्यांत तयार झालेल्या कायद्याचा अभ्यास करून आपल्याकडे अत्यंत कडक असा कायदा करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.