'इस्रो आणि डीआरडीओ या भारत सरकारच्या संस्थांच्या कार्यात सहभागी होण्याची संधी मिळणे हे आमच्यासाठी गौरवास्पद आहे.'
सांगली : भारताच्या अवकाश प्रवासात मानाचा तुरा ठरलेल्या ‘चांद्रयान-३’च्या यशस्वी उड्डाणामध्ये दोन सांगलीकरांनीही (Sangli) योगदान दिले आहे.
यानाच्या निर्मितीमध्ये वापरण्यात आलेल्या धातूच्या भागांना प्रतिरोधक कोटिंग करण्याची जबाबदारी ‘डॅझल डायनाकोट’चे संदीप सोले आणि निहार सोले (Sandeep Sole and Nihar Sole) यांनी पर पाडली.
भारताच्या तिसऱ्या चांद्रमोहिमेसाठी श्रीहरिकोटा येथून ''चांद्रयान-३''ने (Chandrayaan-3) उड्डाण केले. या मोहिमेची तयारी केली दोन वर्षे सुरू होती. संपूर्ण जग कोरोना काळात ठप्प असताना देशाच्या विविध भागात चांद्रयान उभारणीचे काम चालू होते. यातील एक महत्त्वपूर्ण जबाबदारी डॅझल डायनाकोटचे (Dazzle Dynacoates Pvt. Ltd.) संचालक निहार सोले आणि संदीप सोले पार पाडत होते.
या कामगिरीबद्दल बोलताना निहार सोले म्हणाले, चांद्रयानासाठी जे धातूचे भाग वापरण्यात आले, त्यांना संरक्षित करणारा रासायनिक पातळ थर म्हणजेच सुरक्षा कवच म्हणून काम करणारे कोटिंग करण्याची जबाबदारी आमच्याकडे होती. यामुळे यानाच्या उड्डाणावेळी प्रज्वलित होणाऱ्या इंधनापासून यानाच्या भागांचे नुकसान होत नाही.
म्हणजे यान आणि इंधन यांच्यामध्ये हे कोटिंग संरक्षक कवच बनले. यानाच्या सुट्या भागांवर कोटिंग करण्याचे हे काम जवळपास दीड वर्षे सुरू होते. यातील प्रत्येक भाग हा आठ ते दहा टनाचा होता. त्याला संरक्षित रासायनिक थर ज्याला ‘टेफ्लॉन’ असे म्हटले जाते तो लावण्यात आला. एका भागाला हा थर लावण्यासाठी जवळपास दीड महिने इतका कालावधी लागत होता. हा थर रासायनिक दृष्ट्या निष्क्रिय असल्यामुळे यानाच्या इंधनाशी त्याचा रासायनिक संयोग होत नाही.
निहार सोले म्हणाले, २०१९ मध्ये चांद्रयान दोनची मोहीम दुर्दैवाने अयशस्वी झाली. तिसऱ्या मोहिमेची तयारी सुरू झाली. मार्च २०२० मध्ये कोरोनाची साथ आली. मात्र चांद्रयान तीनचे काम सुरू होते. जूनपासून टेफ्लॉन कोटिंगसाठी आमच्याकडे यानाचे भाग येऊ लागले. लॉकडाउन असले तरी केंद्र सरकारनेच या पार्टच्या वाहतुकीसाठी विशेष पत्राद्वारे अनुमती दिली होती. त्यामुळे कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेतही जवळपास दीड वर्षे हे काम चालू होते.
अंतराळ संशोधन संस्थेच्यावतीने (इस्रो) तीनही चांद्रयान मोहिमेसह मंगळ मिशन आणि आजवर जेवढ्या व्हेईकल लॉन्च करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये आमचा असा खारीचा सहभाग राहिलेला आहे. यात केवळ भारतीय उपग्रहच नव्हे, तर इस्रोच्या वतीने फ्रान्स, जपान अशा परदेशी उपग्रहांचे प्रक्षेपणही करण्यात आले आहे, त्यामध्येही वाटा असल्याचे सोले म्हणाले.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या वतीने (डीआरडीओ) जी क्षेपणास्त्रे प्रक्षेपण केले जातात, त्यामध्येही अशा प्रकारचे संरक्षक कवच बनवण्याची जबाबदारी आजवर पार पडली आहे. पृथ्वी, आकाश, अग्नी, ब्राह्मोस अशा विविध क्षेपणास्त्रांच्या प्रक्षेपणांमध्येही आपला सहभाग होता, असे सोले यांनी सांगितले.
इस्रो आणि डीआरडीओ या भारत सरकारच्या संस्थांच्या कार्यात सहभागी होण्याची संधी मिळणे हे आमच्यासाठी गौरवास्पद आहे. या निमित्ताने आम्हाला देशसेवेची संधी मिळते याचा अभिमान वाटतो.
-निहार सोले, संचालक, डॅझल डायनाकोट प्रा. लि.