राज्यासह देशात सध्या लोकसभा निवडणुकीची धूम पाहायला मिळत आहे. राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील प्रचार सभेत बोलताना शरद पवारांचे नाव न घेता, त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. यावेळी मोदींनी 'आतृप्त आत्मा' असा शब्द देखील वापरला होता, दरम्यान मोदींच्या या टीकेला आता अभिनेते किरण माने यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर भाष्य करणाऱ्या किरण मानेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीली असून यामध्ये त्यांनी 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा आहेत...' असं म्हणत शरद पवारांची कारकीर्दच मांडली आहे. यासोबतच देशातील अनेक मुद्द्यांवर देखील बोट ठेवले आहे.
होय, शरद पवार अतृप्त आत्मा आहेत...
लातूर भूकंप असो... मुंबई बॉम्बस्फोट असो... गुजरात भूकंप असो... माळीण दुर्घटना, अवकाळी पावसानं झालेलं शेतीचं नुकसान. निसर्गनिर्मित, मानवनिर्मित कुठलंही संकट असो... सत्ता असली-नसली तरी तिथे पोहचणारा, जनतेला दिलासा देणारा, प्रशासनाला त्वरीत उपाययोजनांचे सल्ले देणारा... परिस्थिती पुर्वपदावर आणण्यासाठी अतृप्त आत्म्यासारखा पिडीत जनतेच्या अवतीभवती फिरत रहाणारा हा माणूस आहे !
आणि त्यांना अतृप्त म्हणणारे मात्र खरंच तृप्त समंध आहेत... समंधाला तृप्तीसाठी नैवेद्य लागतो.
काल बरोबर एक वर्ष पुर्ण झालं...
मणिपूर जळतंय... रोज जळतंय.
भगिनींना विवस्त्र करून धिंड काढली गेली.
साठ हजारांपेक्षा जास्त लोकांना जबरदस्तीनं आपापली घरंदारं सोडावी लागली आणि आपल्याच देशात निर्वासीताचं जगणं जगावं लागतंय.
चार हजाराहून जास्त घरं जाळून संसारांची राखरांगोळी केली गेलीय.
हजारो लोक जखमी होऊन कायमचं अपंगत्व आलंय.
कश्मिरी पंडीतांची हालत याहून भयंकर आहे.
शेतकरी आत्महत्या तिपटीने वाढल्यात. महिलांचे लैंगिक शोषण करणारे नराधम मजेत फिरतायत.
तृप्त समंधांना काहीही फरक पडत नाही. यापैकी कुठेही ते फिरकलेले नाहीत. ते राहुद्या, मनोबल वाढवणारा एक शब्दही त्यांनी उच्चारला नाही.
कारण त्यांनी लाखो करोडोंच्या खंडण्यांचा नैवेद्य खाऊन तृप्तीचा ढेकर दिलेला आहे.
होय, वयाच्या चौर्याऐंशीव्या वर्षीसुद्धा लोकशाही जपण्यासाठी संवैधानिक मार्गाने संघर्ष करणारे शरद पवार अतृप्त आत्मा आहेत.
- किरण माने.
पुण्यातील सभेत बोलताना मोदी म्हणाले होते की "मी आज जे काही बोलेल ते कोणी व्यक्तीगत आपल्यावर घेऊ नये. काही भटकणाऱ्या आत्मा असतात, ज्यांची इच्छा पूर्ण होत नाहीत त्यांची आत्मा भटकत राहते. ज्याचं स्वतःचं काम होत नाही तर ते दुसऱ्यांचं काम देखील बिघडवायला लागतात. आपला महाराष्ट्र देखील अशाच एका अतृप्त आत्मांचा शिकार झाला आहे. आजपासून ४५ वर्षांपूर्वी इथल्या एका मोठ्या नेत्यानं आपल्या महत्वाकांक्षेसाठी या खेळाला सुरुवात केली. तेव्हापासून महाराष्ट्र एक अस्थिरतेच्या काळात ओढला गेला, त्यानंतर अनेक मुख्यमंत्री आपले कार्यकाळ पूर्ण करु शकले नाहीत."
"हा आत्मा विरोधकांनाच अस्थिर करत नाही तर काहीही करु शकतो. हा आत्मा आपल्या पक्षातही असं करते, कुटुंबातही असंच करते. सन १९९५ मध्ये जेव्हा भाजप-शिवसेनेचं सरकार महाराष्ट्रात आलं तेव्हा देखील ही आत्मा सरकार अस्थिर करण्यासाठी काम करत होती. त्यानंतर सन २०१९ मध्ये जनादेशाचा इतका मोठा अपमान केला जे महाराष्ट्राची जनता चांगलं जाणते. पण आज केवळ महाराष्ट्राच नव्हे तर देशात अस्थिरता निर्माण करण्याचा खेळ ही आत्मा करत आहे. त्यामुळं आज भारताला अशा भटकत्या आत्मापासून वाचवून देशाला स्थिर आणि मजबूत सरकारच्या दिशेनं जाणं गरजेचं आहे"", असंही मोदी यावेळी म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.