रत्नागिरी/देवरूख, - "मी उद्या घरी येणार होतो, पण आमची कोकण कृषी विद्यापीठाची ट्रीप (सहल) महाबळेश्वरला जाणार आहे. त्यामुळे माझी वाट पाहू नका.' हेमंत बापूराव सुर्वे (वय 42, रा. थिबा पॅलेस) यांचे कुटुंबाशी भ्रमणध्वनीवरून झालेले बोलणे अखेरचे ठरले. ही ट्रीप मृत्यूची ट्रीप ठरली. पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्यावर बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हेमंत सुर्वे जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी गावचे रहिवासी. आजच्या भीषण अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 20 वर्षांपूर्वी कामाला लागलेले हेमंत हे कोकण कृषी विद्यापीठात प्रशासकीय काम करीत होते. नोकरीमुळे गेले अनेक वर्षे ते पत्नी आणि मुलीसह दापोलीत वास्तव्यास होते. त्यांचे वडील गावातील शिक्षण संस्थेचे 10 वर्षे अध्यक्ष होते. त्यांच्या साथीने हेमंत यांनी गावातील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केले. स्वतःच्या एकुलत्या एक मुलीला उच्चशिक्षित करायची त्यांची इच्छा होती. गेल्या वर्षी दहावी झाल्यावर मुलीच्या पुढील शिक्षणासाठी ते रत्नागिरीत राहायला आले होते. शनिवार-रविवारी सुटीनिमित्त घरी येणारे हेमंत आज कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकला गेले आणि वाटेत झालेल्या भीषण अपघातात त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच तुळसणी गावावर शोककळा पसरली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.