राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे - मुख्यमंत्री

राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे - मुख्यमंत्री

पंढरपूर - सकारात्मक शक्तीचा आविष्कार आषाढी वारीच्या माध्यमातून पहायला मिळतो. या सकारात्मक शक्तीचा उपयोग हरित आणि प्रदूषणमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी करायचा आहे. नमामि चंद्रभागा अभियानातील कामे झाल्यावर चंद्रभागा नदी पूर्वीसारखी निर्मल आणि अविरत वाहताना दिसेल. दुष्काळमुक्तीच्या कामात निसर्गाची साथ मिळून आणि बळिराजा सुखी-संपन्न होऊदे आणि राज्यातील विठ्ठलाच्या रूपातील जनतेची आणखी पुढील पाच वर्षे सेवा करण्याची संधी मिळू दे. राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, असे साकडे आपण आज श्री विठ्ठलाच्या चरणी घातले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्‍मिणीची महापूजा करताना मंदिराच्या बाहेर रांगेत उभा असलेल्या एका दांपत्यास वारकरी प्रतिनिधी म्हणून महापूजेमध्ये सहभागी होण्याचा मान दरवर्षी दिला जातो. यंदा हा मान लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्‍यातील सांगवी सुनेगाव तांडा येथील विठ्ठल चव्हाण व त्यांच्या पत्नी प्रयागबाई यांना मिळाला. 

शासकीय महापूजेच्या आधी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची तर नगराध्यक्षा साधना भोसले आणि त्यांचे पती नागेश यांच्या हस्ते श्री रुक्‍मिणीमातेची नित्यपूजा करण्यात आली. 

फडणवीस यांच्या हस्ते पहाटे दोन वाजून पंचवीस मिनिटांनी श्री विठ्ठलाकडील महापूजेला सुरवात झाली. विठुरायाच्या मूर्तीवर दूध आणि दही स्नान घातल्यानंतर सावळ्या विठुरायाला पीतांबर आणि पिवळ्या रंगाचा रेशमी काठ असलेला सुंदर नक्षीकाम केलेला अंगरखा घालण्यात आला. सोन्याचा टोप घालून नंतर तुळशीचे व लाल-पांढऱ्या फुलांचे आकर्षक हार घालण्यात आले. कपाळी गंध लावून त्यावर तुळशीचे पान लावण्यात आल्यावर राजस सुकुमाराचे रूप अधिकच खुलून दिसू लागले. आरती झाल्यानंतर सर्वांनी "पुंडलिक वरदे हरि विठ्ठल' असा जयघोष केला. श्री रुक्‍मिणी मातेची देखील परंपरेप्रमाणे पूजा करण्यात आली. 

शासकीय महापूजेनंतर मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने सत्कार समारंभ झाला. फडणवीस यांच्या हस्ते वारकरी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याचा मान मिळालेल्या चव्हाण दांपत्याचा श्री विठ्ठल-रुक्‍मिणीची प्रतिमा व एसटीचा एक वर्ष मोफत प्रवासाचा पास देऊन सत्कार करण्यात आला. अनुराधा पौडवाल यांनी चंद्रभागा नदीवर महिलांसाठी सहा चेंजिंग रूम उभी करण्यासाठी देणगी दिल्याबद्दल त्यांचा सत्कार फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. 

मुख्यमंत्र्यांचे सत्कार 
मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्‍न सोडवल्याबद्दल शेतकरी वारकरी महासंघाच्या वतीने अध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या हस्ते घोंगडी आणि वीणा देऊन फडणवीस यांचा सत्कार केला, तर मंदिर कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याबद्दल कर्मचाऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा डॉ. भोसले यांच्या हस्ते, तर अन्य मान्यवरांचे सत्कार सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, संभाजी शिंदे आदींच्या हस्ते करण्यात आले. 

लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याला मान 
यंदा पूजेचा मान लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्‍यातील सांगवी सुनेगाव तांडा येथील विठ्ठल मारुती चव्हाण (वय 61) व त्यांच्या पत्नी प्रयागबाई यांना मिळाला. शेतकरी असलेले हे वारकरी दांपत्य 1980 पासून 39 वर्षे सलग पंढरीच्या वारीला येत आहे. यापुढेही पंढरीची वारी अखंड चालू राहू दे आणि पाऊस चांगला होऊन शेतकरी सुखी होऊ दे अशी प्रार्थना केल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले. 

दिंड्यांना पुरस्कार वितरण 
मंदिर समितीच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा स्वच्छ दिंडीचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार ज्ञानेश्‍वर माउली पालखी सोहळ्यातील मारुतीबुवा कराडकर दिंडीला एक लाख रुपये व मानचिन्ह, दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील सद्‌गुरू म्हातारबाबा पाथरुडकर दिंडीला 75 हजार रुपये रोख व मानचिन्ह आणि तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार एकनाथ महाराज पालखी सोहळ्यातील गुरुदत्त प्रासादिक दिंडीला 50 हजार रुपये व मानचिन्ह अशा स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com