कर्जमाफी योजनेचे ‘तीन तेरा’

किशोर तिवारी
किशोर तिवारी

मुंबई - पाच राज्यांच्या विधानसभांपैकी मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थानमध्ये भाजपचा पराभव व तेलंगणामध्ये भाजपला आलेले दयनीय अपशय पाहता महाराष्ट्राच्या भाजप सरकारला शेतकरी व शेतीप्रश्‍न याबाबत गंभीर व्हावे लागेल, असा सल्ला देत राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीचे ‘तीन तेरा’ वाजल्याची खंत राज्य सरकारने नेमलेल्या कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्‍त केली आहे. 

महाराष्ट्रात भाजप सरकारला शेती व शेतकरी यांच्या नाराजीवर मात करण्यासाठी तिवारी यांनी सरकारला दहा सूत्री ‘महामंत्र’ दिला असून, त्याची कठोर व तत्काळ अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे. राज्य सरकारला ब्लॉग लिहून तिवारी यांनी जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. 

याबाबत अधिक माहिती स्पष्ट करताना ते म्हणतात, की  तेलंगणामध्ये तेलंगणा राज्य समितीला ग्रामीण भागात आलेले अभूतपूर्व यश यामुळे सध्या महाराष्ट्र सरकारसमोर शेतकरी, आदिवासी व गरिबांची नाराजी दूर करण्यासाठी चिंतन सुरू झाले आहे. कारण मागील चार वर्षांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक सुधारणावादी धोरण आखूनही शेतकरी आत्महत्या कमी होताना दिसत नाहीत. याचा थेट परिणाम निवडणुकीवर होण्याचे संकेत आहेत. 

राज्य सरकारने ४५ लाख शेतकऱ्यांना १७ हजार कोटींची कर्जमाफी योजना लागू केली. मात्र, बॅंका व नाकाम सनदी अधिकाऱ्यांनी या ऐतिहासिक कर्जमाफीचे तीन तेरा वाजवल्याचा निष्कर्ष किशोर तिवारी यांनी नोंदवला आहे. कर्जमाफीच्या अपयशाला दूर करायचे असेल, तर एप्रिलपूर्वी केंद्र व राज्य सरकारने कायदा करून सरसकट १०० टक्‍के शेतकऱ्यांना विनाशर्त सातबारा कोरा करण्याची व केंद्र सरकारचा सहभाग असणारी पीककर्ज वाटप योजना सुरू करावी, अशी शिफारस किशोर तिवारी यांनी केली आहे.

शेतकऱ्यांवर पुतना मावशीचे प्रेम
मागील ४ वर्षांत ३६८०  खेड्यात घराघरांत भेटी दिल्यानंतर लोकांनी दिलेल्या सूचनांच्या आधारे हा निष्कर्ष समोर आल्याचे तिवारी म्हणाले. सरकारी अधिकारी, पश्‍चिम महाराष्ट्राचे नेते व मुंबईकर भाजप-शिवसेनेचे मंत्री शेतकऱ्यांवर पुतना मावशीचे प्रेम करतात. समृद्धी मार्ग, मेट्रो,  सिमेंट रस्ते यावर असलेला सरकारचा भर हा पोटभरू नेत्यांना टक्केवारी देणारा विकास अत्यन्त प्रिय आहे, अशी टीकाही तिवारी यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com