मुंबई - उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांची आघाडी झालेली आहे. राज्यातही त्यांची आघाडी झाली असून, ती कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला त्रासदायक ठरणार असल्याची चिन्हे आहेत.
कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत राज्यातील छोट्या पक्षांना सामावून घेण्याचे प्रयत्न सुरूच असले तरीही "सप' आणि "बसप' या दोन पक्षांनी आघाडीने लढण्याचे ठरविले आहे. "बसप' राज्यात 48 जागा लढवणार असे जाहीर केले होते. "बसप'च्या अध्यक्षा मायावती यांनी कॉंग्रेसबरोबर आघाडी केली जाणार नाही, असे जाहीर केले आहे. समाजवादी पक्षाने भिवंडी लोकसभेची जागा मागितली आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी सुरू आहे. "सप' आणि "बसप' यांनी आघाडी केल्याने वंचित बहुजन आघाडीप्रमाणे कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला आणखी एक आव्हान तयार झाले आहे.
बसपची विदर्भात ताकद आहे, तर सपला मुस्लिम बहुल मतदारसंघात मतदान होण्याची शक्यता आहे. राज्यात मुंबई, ठाणे, औरंगाबाद, लातूर , धुळे, परभणी या लोकसभा मतदारसंघांत मुस्लिम मतदारांचे प्रमाण सरासरी 12 टक्क्यांच्या पुढे आहे. त्यामुळे या मतदानावर "सप'चे लक्ष आहे. त्यामुळे बसप-सपची आघाडी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला त्रासदायक ठरणार असल्याचे मानले जाते.
|