Sahitya Sammelan - अमळनेर येथे होणार्या ९७ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली आहे. २०२४ मध्ये २ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत हे संमेलन पार पडेल. संमेलनाच्या आयोजन करणार्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी रविवारी (ता. २५) ही घोषणा केली.
पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेत महामंडळाच्या सर्व घटक आणि संलग्न संस्थांची बैठक पार पडली. या बैठकीत संमेलनाध्यक्षांच्या नावासह संमेलनाच्या तारखा आणि कार्यक्रम पत्रिकेवर देखील चर्चा झाली. यावेळी महामंडळाच्या कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, उपाध्यक्ष रमेश वंसकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आदी उपस्थित होते.
संमेलनाध्यक्षपदासाठी यंदा डॉ. शोभणे यांच्यासह कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी, ज्येष्ठ समीक्षक बाळकृष्ण कवठेकर यांचीही नावे चर्चेत होती. त्यातही प्रवीण दवणे यांचे नाव आघाडीवर होते. परंतु, महामंडळाच्या बैठकीत डॉ. शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. डॉ. शोभणे यांच्याव्यतिरिक्त चर्चेत असलेली नावे अधिकृतपणे सांगण्यास मात्र प्रा. उषा तांबे यांनी नकार दिला.
संमेलनातील कार्यक्रमांची रुपरेषाही या बैठकीत निश्चित करण्यात आली. त्यानुसार संमेलनाचा प्रारंभ होण्याच्या आदल्या दिवशी बालमेळावा होणार आहे. पहिल्या दिवशी ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन आणि ध्वजवंदन झाल्यानंतर संमेलनाचा उद्घाटन समारंभ होणार आहे. त्यानंतरच्या कार्यक्रमांमध्ये मुलांचा विशेष कार्यक्रम, निमंत्रितांचे कविसंमेलन आणि ‘खान्देशी बाणा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी मुलाखत, दोन परिसंवाद, दुपारी कथाकथन, एका जुन्या पुस्तकावर परिचर्चा, परिसंवाद, ‘खान्देश साहित्य वैभव’ हा विशेष कार्यक्रम आणि आजच्या कवींद्वारे जुन्या व नव्या कवितांचे सादरीकरण, हे कार्यक्रम होणार आहेत. अखेरच्या दिवशी परिसंवाद, अभिरूप न्यायालय, साहित्यिकांचे शताब्दी स्मरण या कार्यक्रमांनंतर सायंकाळी ४ वाजता संमेलनाचा समारोप होईल.
कविकट्टा आणि ग्रंथ प्रकाशन कट्टा हे उपक्रम नेहमीप्रमाणे होणार असून ग्रंथप्रदर्शनातील गाळ्यांची संख्या मात्र यंदा ३५० गाळ्यांवरून २५० इतकी कमी करण्यात आली आहे. १०' x १२' आकाराचा प्रत्येक गाळा असून प्रकाशकांना १ फेब्रुवारीलाच सकाळी अकरा वाजता गाळे उपलब्ध करून दिले जातील, असेही प्रा. तांबे यांनी सांगितले.
भरघोस वाङ्मयीन कार्य केलेल्या डॉ. रवींद्र शोभणे यांची ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. संमेलनाच्या तारखा आणि कार्यक्रमांची रुपरेषा आम्ही निश्चित केली असून उर्वरित तपशील लवकरच निश्चित केले जातील.- प्रा. उषा तांबे, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.