अनिल देशमुखांनी राजीनाम्यात काय म्हटलं? पाहा त्यांचं पत्र

अनिल देशमुखांनी राजीनाम्यात काय म्हटलं? पाहा त्यांचं पत्र

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सपुर्द केला आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी १०० कोटींच्या वसुलीचे आरोप लावले होते. त्यानंतर याप्रकरणावर अॅड. जयश्री पाटील यांनी मुंबई हायकोर्टात याचिका केली होती, या याचिकेवर सुनावणीवेळी हायकोर्टाने सीबीआयला १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिलेत, त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाची आता सीबीआय चौकशी होणार आहे. सीबीआयची चौकशी होणार असल्यामुळे या पदावर राहणं योग्य नसल्याचं सांगत अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. (हेही वाचा ; मोठी बातमी : अनिल देशमुखांनी दिला गृहमंत्रीपदाचा राजीनामा)

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख राजीनामा दिल्याची माहिती  राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली. सीबीआय चौकशी दरम्यान गृहमंत्री पदावर राहणं योग्य नसल्याच मत अनिल देशमुख यांनी  पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मांडलं. अनिल देशमुख यांच्या या निर्णाला शरद पवार यांनीही ग्रीन सिग्नल दिला. अनिल देशमुख यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सपूर्द केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबतचा निर्णय घेतील. मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा नक्कीच स्वीकारतील, असं नवाब मलिक म्हणाले. 

अनिल देशमुख यांचं राजीनामापत्र -

प्रति, 
मा. ना. श्री. उद्धव ठाकरे साहेब, 
मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य, 
मंत्रालय, मुंबई

आदरणीय महोदय, 
मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी त्यांच्याकडे अॅ. जयश्री पाटील यांचेद्वारे दाखल याचिकेद्वारे दाखल याचिकेमध्ये आज, दिनांक ५ एप्रिल २०२१ रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सी.बी.आय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारत केलेले आहेत. त्यानुषंगानं मी, मंत्री (गृह) या पदावर राहणं मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही, म्हणून मी स्वत:हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे. 
सबब, मला मंत्री (गृह) या पदावरुन कार्यमुक्त करावे, ही नम्र विनंती.
                                                आपला, 
                                             अनिल देशमुख

वाझे यांच्या मार्फत महिन्याला 100 कोटी रुपये वसुली करण्याचे आदेश दिल्याचा खळबळजनक आरोप परमबीरसिंग यांनी केला होता. पहिल्यांदाच एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडून थेट गृहमंत्र्यांवर वसुलीचा आरोप झाल्यामुळं अखेर सरकारला अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा लागला आहे. सचिन वाझे प्रकरण सुरुवातीला वाझे आणि काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत मर्यादीत राहील असे वाटत होते. मात्र, विरोधक सुरुवातीपासून या प्रकरणी देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत होते. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार पत्रकार परिषद घेऊन देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. विधानसभेत आणि विधानसभेबाहेरही त्यांनी हा विषय लावून धरला होता. अखेर देशमुखांच्या राजीनाम्याची वेळ सरकारवर आल्याने आघाडी सरकारवर नामुष्की ओढवली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com