मंत्रिमंडळ विस्तार लवकरच - मुख्यमंत्री 

मंत्रिमंडळ विस्तार लवकरच - मुख्यमंत्री 

मुंबई -  निराशाजनक कामगिरी करणाऱ्या राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना अर्धचंद्र दिला जाण्याची शक्‍यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्‍त केली. नारायण राणे हे आता "एनडीए'चा भाग झाले असल्याने मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचा विचार निश्‍चितपणे केला जाईल, असेही फडणवीस यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात स्पष्ट केले. 

मंत्रिमंडळाची फेररचना लवकरच केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. नव्या मंत्र्यांची बसण्याची सोय कुठे करणार? कार्यालये सुरू करायला जागा कुठे आहे, असे विचारले असता ते सूचकपणे म्हणाले, "जागा निर्माण करणे तर कठीण आहे; पण सध्याच्या मंत्र्यांच्या जागा काहींना दिल्या जाऊ शकतात.' मंत्रिमंडळ विस्तार केव्हा करणार, या प्रश्‍नावर त्यांनी "लवकरच' असे उत्तर दिले. 

नांदेड महापालिका निवडणुकीतील भाजपच्या पराभवाचा मित्र पक्षाला चांगलाच आनंद झालेला दिसला. परंतु विधानसभा निवडणुकीत उमेदवार निवडून दिल्यानंतरही नांदेडकरांनी महापालिकेत भुईसपाट का केले याचे आत्मचिंतन त्यांनी करावे, असा टोला फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला. नांदेडमधील विजयामुळे कॉंग्रेसला उभारी मिळण्याची शक्‍यता नाही असे सांगत, कॉंग्रेस कशाच्या आधारावर आक्रमक होईल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

नांदेडमध्ये भाजपचा पराभव झाला असला, तरी पक्षाच्या जागा आणि मते वाढल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या निवडणुकीत नांदेडमध्ये भाजपला सहा टक्के मते मिळवून दोन जागा मिळाल्या होत्या. या वेळी 25 टक्के मते मिळाल्यानंतर भाजपला सहा जागा मिळाल्या. कॉंग्रेसची मते 38 टक्‍क्‍यांवरून 46 टक्‍क्‍यांवर गेली. परंतु शिवसेना 18 टक्‍क्‍यांवरून सहा टक्‍क्‍यांवर आली. राष्ट्रवादी कॉंग्रेस 17 टक्‍क्‍यांवरून चार टक्‍क्‍यांवर आली, तर "एमआयएम'चा मतांचा टक्काही घसरला, असे ते म्हणाले. 

मनसेतील सहा नगरसेवकांचे पक्षांतर घडवून आणताना मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याची तक्रार भाजपचे खासदार किरीट सोमैया यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे. याकडे लक्ष वेधले असता, तक्रारीनुसार लाचलुचपत विभाग चौकशी करेल, असे फडणवीस यांनी सांगितले. 

सुप्रिया सुळे व राज ठाकरेंना टोला 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुलेट ट्रेनला विरोध करताना बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नसल्याचा इशारा दिला आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, "बुलेट ट्रेन ही भुयारी असणार आहे, त्यामुळे भुयाराखाली एकही वीट रचली जाणार नाही,' असा टोला फडणवीस यांनी राज यांना लगावला. कोपर्डीचा निकाल लवकर लागला नाही, तर मुख्यमंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला होता. यावर भाष्य करताना, मी कुणाच्या जिवावार महाराष्ट्रात फिरत नाही, तर जनतेच्या जिवावर फिरतो,' असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com