30 वर्षांपूर्वीही शिवसेनेवर आलं होतं संकट, बाळासाहेबांनी घेतला होता मोठा निर्णय!

Balasaheb Thackeray Uddhav Thackeray
Balasaheb Thackeray Uddhav Thackerayesakal
Summary

शिवसेनेतील वर्चस्वाच्या लढाईनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलंय.

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi Government) राजकीय उलथापालथ सुरूच आहे. शिवसेनेतील वर्चस्वाच्या लढाईनंतर, राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलंय. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं सरकार जाणं निश्चित मानलं जात आहे. अशा स्थितीत 30 वर्षांपूर्वी 1992 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी जो डाव चालवला होता, तोच डाव उद्धव ठाकरेंनी खेळलाय. आता उद्धव ठाकरे हे संकट टाळतील का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi government) विरोधात पक्षाच्या अनेक आमदारांनी बंडाचा बिगुल फुंकलाय. शिंदे आणि इतर बंडखोर आमदार बुधवारी पहाटे सुरतहून आसाममधील गुवाहाटीला रवाना झाले. शिंदेंनी आपल्या बाजूनं 50 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केलाय.

या बंडामुळं सरकार अडचणीत असल्याचं पाहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी आपल्या भाषणात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन संवाद साधत शिवसेनेतील बंडखोरांना भावनिक आवाहन केलं. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रिपदी नको असेन तर काय करायचं? सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा माझ्यासमोर येऊन सांगायचं, तुम्ही मुख्यमंत्रिपदी नको. मी राजीनामा देण्यास तयार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. 1992 मध्येही त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांनी अशीच कणखर वृत्ती दाखवली होती. दरम्यान, काल बुधवारी रात्री ते कुटुंबासह 'वर्षा' या सरकारी बंगल्यातून 'मातोश्री' या खासगी निवासस्थानी गेले आहेत.

Balasaheb Thackeray Uddhav Thackeray
'क्षणाचाही विलंब न करता उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा'

30 वर्षांपूर्वी 1992 साली आपण शिवसेना सोडत असल्याचं बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी म्हटलं होतं. ज्या पक्षाला बाळासाहेब ठाकरे यांनी वाढवलं, पक्षात प्राण फुंकला तोच पक्ष सोडण्यासाठी बाळासाहेब ठाकरे तयार झाले होते. हा सर्व किस्सा 1992 सालच्या सामनामधील एका लेखात देण्यात आलाय. त्यावेळी शिवसेनेचे एक जुने नेते माधव देशपांडे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. तसेच उद्धव आणि राज ठाकरे हे पक्षाच्या कारभारात खूप हस्तक्षेप करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता.

Balasaheb Thackeray Uddhav Thackeray
'जे स्वत:चं सरकार वाचवू शकले नाहीत, ते उद्धव ठाकरेंचं सरकार वाचवायला निघालेत'

मात्र, या आरोपांनी बाळासाहेब ठाकरे हे दुखावले गेले होते. त्यानंतर त्यांनी सामनामधून (Samana News Paper) मी आणि माझे कुटुंब शिवसेनेतून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं. मात्र, बाळासाहेबांच्या या भूमिकेमुळं शिवसैनिकांमध्ये गोंधळ उडाला होता. शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं होतं. तेव्हा बाळासाहेबांनी शिवसैनिकांना शांत करत म्हटलं होतं की, मला एका तरी शिवसैनिकानं सांगावे की मी तुमच्यामुळं पक्ष सोडला. त्यानंतर मी पक्षप्रमुख पदाचा त्याग करेल. माझं कुटुंब देखील शिवसेनेमध्ये राहणार नाही, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. लवकरच हे प्रकरण मिटलं. आता उद्धव ठाकरेही त्याच पावलावर पाऊल टाकताना दिसत आहेत. मात्र, 1992 च्या बाळासाहेब ठाकरे आणि आताचा काळ यात खूप फरक आहे. त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या या मनोवृत्तीचा काय परिणाम होईल, हे सांगणं कठीण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com