मुंबई : राज्यातील सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीला पुन्हा एकदा बहुमत मिळाल्याचे चित्र आहे. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीने युतीला जोरदार टक्कर दिल्याचे पाहायला मिळाले आहेत. एक्झिट पोलमध्ये वर्तविलेले सर्व अंदाज चुकीचे असल्याचे या निकालावरून स्पष्ट होत आहे.
राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज (गुरुवार) सकाळपासून सुरू झाली. सुरवातीच्या कलानुसार भाजप-शिवसेना महायुती सत्तेत गेल्याचे स्पष्ट दिसत होते. तर, महाआघाडीने शतक पूर्ण केल्याचेही दिसत आहे. महायुतीने सुमारे 163 जागांवर आघाडी घेतली आहे. तर, महाआघाडी 101 जागांवर पुढे असल्याचे चित्र आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पक्षांतर करून सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केल्याने यंदाची विधानसभा निवडणूक गाजली आहे. काही अपवाद वगळता यापैकी सर्व "आयारामां'ना सत्ताधारी पक्षांनी उमेदवारी दिली होती, त्यामुळे या जागांच्या निकालाकडे लक्ष होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती आणि नारायण राणे यांचे पुत्र नितेश यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील माजी मंत्री नशीब अजमावत आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील सुरक्षित कोथरूड मतदारसंघ निवडल्याने सुरवातीला त्यांच्या उमेदवारीला विरोध झाला होता, त्यामुळे या मतदारसंघाकडेही सर्वांचे लक्ष आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.