परीक्षा सोपी जाण्यासाठी ‘हे’ नक्की वाचा! अभ्यासाचे वेळापत्रक कमी करेल ताण; सदृढ आरोग्य यशाची गुरूकिल्ली; शांत झोप, संतुलित आहार जरूरी

परीक्षा काळात अभ्यासाचे तयार केलेले वेळापत्रक, नोट्‌स काढून केलेला अभ्यास व पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा सराव, या त्रिसुत्रीमुळे निश्चितपणे ताण कमी होतो. गुणांची टक्केवारी म्हणजे संपूर्ण आयुष्य नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी, आरोग्याची काळजी देखील घ्यावी, असे आरोग्यतज्ज्ञ सांगतात.
studying-abroad
studying-abroadsakal

सोलापूर : परीक्षा म्हटले की अभ्यास व गुणांच्या टक्केवारीचे टेन्शन. पण, परीक्षा काळात अभ्यासाचे तयार केलेले वेळापत्रक, नोट्‌स काढून केलेला अभ्यास व पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा सराव, या त्रिसुत्रीमुळे निश्चितपणे ताण कमी होतो. गुणांची टक्केवारी म्हणजे संपूर्ण आयुष्य नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी, आरोग्याची काळजी देखील घ्यावी, असे आरोग्यतज्ज्ञ सांगतात.

पालकांचे विद्यार्थ्यांवरील अपेक्षांचे ओझे, परीक्षा काळातील अभ्यासाचा ताण तथा दडपण, बिघडलेले आरोग्य, कमी झालेला आत्मविश्वास, या प्रमुख बाबींचा परिणाम थेट परीक्षेवर होतो. त्यामुळे परीक्षेच्या काळात पालकांनी कुटुंबातील वातावरण शांत व आनंदी ठेवणे जरूरी आहे. मुलांवर अपेक्षांचे ओझे न लादता त्यांना धीर देऊन मुलांचा आत्मविश्वास वाढविणे देखील गरजेचे आहे.

परीक्षेच्या काळात पालकांनी आपल्या मुलासोबत सुसंवाद ठेवावा. विद्यार्थ्यांनीही परीक्षेचा ताण न घेता शांत झोप, नियोजनबद्ध अभ्यास आणि सकाळी लवकर उठून (पहाटे पाच वाजता) अभ्यास केल्यास निश्चितपणे त्याचा चांगला परिणाम गुणांच्या टक्केवारीवर होतो. स्वत:हून काढलेल्या नोट्‌सचे वाचन करावे. परीक्षेच्या काळात देखील योगा, ध्यानधारणा, व्यायाम करावा आणि आपला छंद जोपासावा, जेणेकरून मनावरील परीक्षेचा ताणतणाव कमी होऊन आत्मविश्वास वाढेल, असेही आरोग्यतज्ज्ञ सांगतात. परीक्षा अचानक ठरलेली नसते, वर्षभर केलेल्या अभ्यासाचे मूल्यमापन असते. त्यामुळे जास्त ताण न घेता आपण वर्षभर जे शिकलो ते आठवावे आणि केलेल्या अभ्यासाद्वारे परीक्षेला सामोरे जावे, असे शिक्षणतज्ज्ञ सांगतात.

आरोग्याची खबरदारी घ्या, परीक्षेत छान फायदा होईल

फेब्रुवारी- मार्च महिना आला की दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा तणाव वाढतो. वर्षभर घेतलेल्या मेहनतीचा कस लागतो. शारीरिक व मानसिक आरोग्याची खबरदारी घेऊनही ऐन परीक्षा काळात आरोग्य बिघडल्यास त्याचा थेट परिणाम परीक्षेवर (गुणांच्या टक्केवारीवर) होतो. त्यामुळे प्रत्येकांनी परीक्षा काळात स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी.

- डॉ. गायत्री देशपांडे, आयुर्वेद तज्ज्ञ

विद्यार्थ्यांसाठी आरोग्याच्या टिप्स...

  • - परीक्षा काळात रात्री सात ते आठ तासांची शांत झोप आवश्यक असून झोपीनंतर ताजीतवानी झालेल्या इंद्रियांमुळे चांगल्या पद्धतीने विषयाचे आकलन व ग्रहण करू होते.

  • - अभ्यासाला सतत एकाच जागेवर बसल्याने पाठ, मान दुखणे, अवघडल्यासारखे होते. त्यामुळे अधून मधून उठून थोडे चालावे. स्ट्रेचिंग व्यायाम देखील उत्तम ठरतो. दहा मिनिटांच्या व्यायामामुळे पाठ, मान दुखत नाही.

  • - सतत वाचन, लेखन, अभ्यासामुळे डोळ्यावर, मनावर ताण येतो. तो ताण कमी करण्यासाठी काहीवेळाने डोळे मिटून शांत बसावे, डोळ्यावर थंड पाणी, गुलाब जल, दुधाची पट्टी ठेवावी.

  • - अभ्यासावेळी अधून मधून कुटुंबातील व्यक्तींसोबत गप्पा मारा. हास्य विनोद करा, आवडीचे संगीत ऐकावे, जेणेकरून मनावरील ताण हलका होतो आणि अभ्यासासाठी ऊर्जा मिळते.

  • - उत्तम आरोग्यासाठी संतुलित आहार महत्त्वाचा आहे. परीक्षेच्या काळात बाहेरील पदार्थ खाणे टाळा. घरी बनविलेला आहार घ्यावा. उन्ह वाढले म्हणून फ्रिजमधील थंड पाणी किंवा पदार्थ, पेय्य घेणे टाळा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com