कुपोषित बालके आहाराविना! अंगणवाड्यांना ५२ दिवसांपासून कुलूप; सेविका-मदतनीस कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरूच

एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांच्या आरोग्याची खबरदारी घेतली जाते. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मदतीने त्यांना दरमहा पोषण आहार दिला जातो. दुसरीकडे गर्भवती महिलांचे बाळ सुदृढ जन्मावे म्हणूनही सहा महिन्यांपासूनच त्यांची काळजी घेतली जाते.
malnutrition children
malnutrition childrenSakal

सोलापूर : जिल्ह्यात १४६ कुपोषित बालके असून दोन हजारांवर बालके कुपोषणाच्या उंबरठ्यावर आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे त्यांना मागील दीड महिन्यांपासून पूरक पोषण आहार मिळालेला नाही. दुसरीकडे ६ महिने ते ३ वर्षांपर्यंतच्या बालकांचीही अशीच दुरवस्था आहे. ५२ दिवसानंतरही संप सुरूच असून अंगणवाड्यांना कुलूप असल्याने त्यांचे प्रचंड हाल होत असल्याची वस्तुस्थिती सोलापूरसह संपूर्ण राज्यभरात आहे.

सोलापूरसह राज्यभरात साडेचार लाखांवर कुपोषित व कुपोषणाच्या उंबरठ्यावरील बालके आहेत. एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांच्या आरोग्याची खबरदारी घेतली जाते. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मदतीने त्यांना दरमहा पोषण आहार दिला जातो. दुसरीकडे गर्भवती महिलांचे बाळ सुदृढ जन्मावे म्हणूनही सहा महिन्यांपासूनच त्यांची काळजी घेतली जाते.

मूल जन्मल्यानंतर बाळ सहा महिन्याचे होईपर्यंत त्या स्तनदा मातांनाही आहार दिला जातो. त्यानंतर ६ महिने ते ३ वर्षांपर्यंतच्या बालकांना घरपोच आहार दिला जातो. त्यानंतर तीन ते सहा वर्षांपर्यंतच्या बालकांना अंगणवाड्यांमध्ये शिजवून आहार दिला जातो. मात्र, ही यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. त्याचे कारण म्हणजे ५२ दिवसांनंतरही न मिटलेला अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप हे आहे. या संपामुळे अनेक महिला आपल्या चिमुकल्यांना घेऊन रोजगार हमीच्या कामावर जात असल्याचेही सांगितले जात आहे. अशा परिस्थितीचे भविष्यात विपरीत परिणाम दिसतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

कच्चा आहार घरपोच देण्याचे नियोजन

सध्या सोलापूर जिल्ह्यातील बाराशे अंगणवाडी सेविका व मदतनीस कामावर रुजू झाल्या आहेत. पर्यवेक्षक व त्यांच्या मदतीने आता कुपोषित बालकांसह ६ महिने ते ३ वर्षांपर्यंतची बालके आणि स्तनदा माता, गर्भवती महिलांना आहार घरपोच दिला जाणार आहे.

- प्रसाद मिरकले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर

अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांनाही कच्चा आहार, पण...

जिल्ह्यातील चार हजार ७३० अंगणवाड्यांमध्ये दीड लाखांवर (३ ते ६ वर्षे) चिमुकले आहेत. दुसरीकडे तेवढीच बालके ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील आहेत. अंगणवाड्या बंद असल्याने त्या सर्वांनाच आता पूरक पोषण आहार घरपोच दिला जाणार आहे. संपामुळे अंगणवाड्यांमध्ये शिजवून आहार देण्याची यंत्रणाच अस्तित्वात नाही. त्यामुळे असा पर्याय काढण्यात आला आहे. मात्र, जानेवारी संपतोय तरीदेखील तो आहार घरपोच झालेला नाही, हे विशेष.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com