मुख्यमंत्र्यांकडून साप सोडण्याचे, चंद्रकांत पाटीलांची बेजबाबदार वक्तवे: पवार

Sharad Pawar
Sharad Pawar

नवी दिल्ली : "मराठा समाजातील वंचित तरुणांनी शांततेच्या मार्गाने आतापर्यंत त्यांच्या आरक्षणासह इतर मागण्या मांडल्या व कधीही कायदा व सुव्यवस्थेला धक्का पोचू दिला नाही. या अस्वस्थतेची दखल घेतली जात नसल्याने काहींनी आत्महत्येचा मार्गही स्वीकारला. परंतु, राज्य सरकारने याची उचित दखल न घेतल्याने आता उद्रेकाची स्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री किंवा त्यांचे मंत्री या विषयाचे गांभीर्य समजण्याऐवजी चिथावणीदायक विधाने करताना आढळत आहेत, ही बाबही अतिशय खेदजनक आहे,'' असे निवेदन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे जारी केले. 

"या परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी तत्काळ पावले उचलण्याची गरज होती; परंतु विठ्ठल पूजेच्या निमित्ताने वारकऱ्यांना त्रास होईल अशी साप सोडण्याची विधाने त्यांनी केली. त्यात चंद्रकांत पाटील यांच्या बेजबाबदार विधानांची भर पडली व त्यामुळे बहुसंख्य घटकांचा संताप अनावर झाला आहे. परिस्थिती चिघळण्यास ही मंडळीच जबाबदार आहेत,'' अशी टीकाही पवार यांनी केली आहे. 

"ही परिस्थिती वेळीच आटोक्‍यात राखण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने आंदोलनात सहभागी महत्त्वाच्या घटकांना त्वरित बोलावून त्यांच्याशी संवाद साधावा व यातून मार्ग काढण्याची प्रक्रिया चालू करावी. त्याचबरोबर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टाळणे व सर्वसामान्यांना आंदोलनाची झळ बसणार नाही याची खबरदारीही आंदोलन करणाऱ्यांनी घ्यावी आणि आतापर्यंत या आंदोलनाला जनतेची असलेली सहानुभूती टिकवून ठेवावी,'' असे आवाहनही त्यांनी केले. 

"समाजातील तरुणांनी केलेल्या आरक्षणाच्या मागणीचा विचार करताना सरकारने मराठा समाजातील उच्चशिक्षित व सुस्थितीतील घटकांचा विचार केला नाही तरी चालेल; परंतु मराठा समाजातील बहुसंख्य व वंचित अशा घटकांचा विचार करावा. हे करताना राज्यघटनेने अनुसूचित जाती-जमाती, आदिवासी व अन्य मागासवर्गीयांना (ओबीसी) दिलेल्या सवलतींना धक्का लागणार नाही याचीही खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. मराठा समाजातील बहुसंख्य तरुणांना आरक्षणाची गरज आहे, ही बाब येथे लक्षात ठेवणे आवश्‍यक आहे,'' याकडे पवार यांनी निवेदनात लक्ष वेधले आहे. 

"काही घटक आरक्षणाचे प्रमाण पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक होत असल्याचा दावा करतात व त्याचा आधार घेऊन या मागणीच्या अंमलबजावणीबाबत प्रश्‍न उपस्थित करीत असतात. परंतु या संदर्भात तमिळनाडूचे उदाहरण लक्षात घेता, तेथे सुमारे सत्तर टक्‍क्‍यांपर्यंत आरक्षण दिले जाते, ही बाब महाराष्ट्र सरकारला ध्यानात ठेवावी लागेल,'' अशी सूचना करून पवार यांनी, यासाठी राज्य शासनाने निर्णय करून त्याबाबतची बाजू न्यायालयात प्रभावीपणे मांडली पाहिजे. तसेच, धनगर व मुस्लिमांमधील काही वर्गांच्या आरक्षणाची मागणीही गंभीर असून, तिचाही सहानुभूतीने विचार करण्यास सांगितले आहे. 

समाजातर्फे केली जाणारी आरक्षणाची मागणी व सर्व संबंधित मुद्दे हे गंभीर आहेत. गोखले इन्स्टिट्यूटतर्फे प्रकाशित एका अहवालाचा हवाला देऊन पवार यांनी म्हटले आहे, ""विदर्भ व मराठवाडा या भागातील शेतकरी आत्महत्यांची दखल घेण्याची गरज आहे. 2014-16 या दोन वर्षांत एकंदर शेतकरी आत्महत्यांपैकी 42 टक्के आत्महत्या या मराठा समाजातील शेतकऱ्यांच्या आहेत, यावरून त्यांची अवस्था किती भीषण आहे हे लक्षात येते. या आत्महत्यांमागे प्रतिकुटुंब घटत जाणाऱ्या जमिनीचे प्रमाण हेदेखील एक प्रमुख कारण आहे. याखेरीज शेतीमालास रास्त भाव देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष, त्यातून आर्थिक नुकसान व परिणामी वाढता कर्जबाजारीपणा आणि सरतेशेवटी आत्महत्या अशा चक्रात हा समाज सापडला आहे. याचा सर्वाधिक फटका या समाजातील तरुणांना बसलेला आहे व यातूनच आरक्षणाची मागणी पुढे आली आहे. आतापर्यंत या तरुणांनी शांततेच्या मार्गाने त्यांच्या या मागण्यांना वाचा फोडण्याचा मार्ग अवलंबिला; परंतु याऐवजी "आम्ही सगळे काही केलेले आहे' अशी विधाने मंत्र्यांकडून व विशेषतः चंद्रकांत पाटील यांनी केलेली विधाने यामुळे या तरुणांमध्ये व एकंदरीतच समाजात त्याबद्दलचा संताप आढळून येतो.'' 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com