दिमाखदार सोहळ्यात "गोदावरी गौरव' पुरस्कारांचे वितरण 

live photo
live photo

नाशिक :  महाराष्ट्रातील लोकसेवा, साहस, चित्र, ज्ञान, चित्रपट, संगीत क्षेत्रातील दिग्गजांचा "गोदावरी गौरव' पुरस्कार देऊन त्यांना कृतज्ञतेचा नमस्कार करण्यात आला. श्री. कर्णिक यांच्या हस्ते डॉ. रवींद्र व स्मीता कोल्हे (लोकसेवा), डॉ. स्नेहलता देशमुख (ज्ञान), सुभाष अवचट (चित्र, शिल्प), पं. सत्यशील देशपांडे (संगीत), अमोल पालेकर (चित्रपट, नाट्य), सुदर्शन शिंदे, महेश साबळे (साहस) या मान्यवरांना "गोदावरी गौरव' पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. एकवीस हजार रूपये, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.     

रावसाहेब थोरात सभागृहात कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे गोदावरी गौरव पुरस्कारांचे वितरण झाले. तिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. यावेळी महापौर रंजना भानसी, उपाध्यक्ष संजय पाटील, अरविंद ओढेकर, विनायक रानडे, गुरूमित बग्गा, डॉ. विनय ठकार, डॉ. कुणाल गुप्ते आदी उपस्थित होते. श्री. कर्णिक म्हणाले, की कुसुमाग्रजांचे स्मरण कदापिही संपणारे नाही. "जाता जाता गाईन मी' असे त्यांनी सांगितले होते. कुसुमाग्रज माणूस म्हणूनही श्रेष्ठ होते. कवित्व त्यांचा श्‍वास होता. समाजाकडे अत्यंत व्यापक दृष्टीने त्यांनी पाहिले. त्यांनी संपूर्ण जीवनावर, समाजावर प्रेम केले. प्रेम हे जगातील संस्कृतीचा सारांश आहे, असे त्यांनी म्हटले होते. ते कला, शिक्षण, चित्र, नृत्यातून व्यक्त होत असते. प्रेमाची त्यांनी आयुष्यभर सर्वांवर उधळण केली. कुसुमाग्रज हे तुमच्या आमच्या पिढीतील शेवटची अशी व्यक्ती आहे ज्यांच्यासमोर नैवेद्य ठेवावा आणि त्याचा प्रसाद ग्रहण करावा. आणि तुम्हाला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे एक प्रसाद असून तुमच्या कलेचा मोठा सन्मान आहे. 
कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी प्रास्ताविकातून प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेतला. कवी किशोर पाठक यांनी आपल्या खुमासदार शैलीत पुरस्कारार्थीचा परिचय करून दिला त्यामुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. "सर्वात्मका सर्वेश्‍वरा' या गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. 

सत्कारार्थींचे बोल.... 
नाशिकच्या पावनभूमीत हा पुरस्कार मिळतो आहे हाच आमचा गौरव आहे. मी एक हाय प्रोफाईल असलेली डॉक्‍टर जेव्हा रवींद्र कोल्हेंबरोबर लग्न होऊन आदिवासी भागात गेले तेव्हा तेथील संस्कृतीची जाणीव झाली. त्या ठिकाणी स्त्रीभ्रूणहत्या नाहीच. तिथे अजूनही स्त्रीला सन्मान दिला जातो. मुलींच्या जन्माचा उत्सव होतो. स्त्रीच्या परवानगीशिवाय कोणताही निर्णय घेतला जात नाही. "अतिथी देवो भवः' ही संस्कृती ते जोपासतात. वृद्धाश्रम नाही,
- डॉ. स्मीता कोल्हे (लोकसेवा) 

गेल्या 14 वर्षांपासून पोलिस सेवेत आहे. पोलिस विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात. अग्नीतांडव झाले तेव्हा भिती वाटली नव्हती. पोलिसांचे टीमवर्क असते. पोलिसांना वेळोवेळी शाबासकीची थाप मिळणे आवश्‍यक आहे. आई म्हणायची, की "जीओ तो शेर बनके जीओ' हे वाक्‍य कायम लक्षात राहिले
- सुदर्शन शिदे (साहस) 

पुरस्कार कोणाच्या नावाने दिला जातो ते फार महत्त्वाचे आहे. आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले पण या पुरस्काराचे महत्त्व वेगळे आहे. जुन्या नव्यांची सांगड कशी घालायची हे फक्त कुसुमाग्रजांनाच जमू शकते. शिक्षण माणूसकीचा आधार घेत झाले पाहिजे. पहिल्यांदा तात्यांना 1990 साली भेटले. कुलगुरू असताना आईचे नाव वडीलांच्या बरोबरीने असले पाहिजे, 
- डॉ. स्नेहलता देशमुख (ज्ञान) 

कुसुमाग्रज आणि भेट कॉन्टीनेंटल प्रकाशन, पुणे येथे पहिल्यांदा झाली होती. मला आतापर्यंत अनेक पारितोषिके मिळाली पण या शब्दमहर्षींच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार महत्त्वाचा वाटतो. तात्यासाहेबांमुळे मी अनेकदा नाशिकला आलो. निसर्गाचे अतिशय सुंदर मिश्रण येथे आहे. येथील डोंगरांनी मला आकर्षित केले आहे. पुरस्कारा मिळाल्याचा आनंद जसा आहे तसाच आज कुसुमाग्रज नाही याची खंतही आहे. 
- सुभाष अवचट (चित्रकला) 

मी कुसुमाग्रज पाहिलेला माणूस आहे. तात्यासाहेबांमुळे माझे विचार स्पष्ट झाले. माझे काका नाशिकला राहत असताना त्यांच्यासोबत मी अनेकदा तात्यांकडे जात असे. त्यांच्यासमोर काही बंदिशी सादर केल्या होत्या त्या त्यांना खूप आवडल्या. समाजातल्या नागरिकांचे सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्याचे काम सध्या करतो आहे. 
- पं. सत्यशील देशपांडे (संगीत) 

या पुरस्काराने मी खरोखर भारावून गेलो आहे. कुसुमाग्रजांनी माझ्या संपूर्ण पिढीला प्रेरणा दिली. संवेदना विकसीत केल्या. सामाजिक बांधिलकीची जाणीव दिली, हे सगळं दान आमच्या पदरात टाकलं. मला त्यांचा सहवास मोजकाच लाभला. सत्तरच्या दशकात आम्ही पहिल्यांदा भेटलो. गप्पांच्या ओघात मी त्यांच्याच कविता त्याना ऐकवण्याचे धाडस केले. माझ्या कवितेवर तुम्ही मनापासून प्रेम करतात, असे जेव्हा ते म्हणाले तेव्हा मी अवाक्‌ झालो. काही तासांच्या भेटीत त्यांनी माझ्या झोळीत खूप काही टाकलं होतं. "नटसम्राट'ला मी क्‍लासिक मानायला तयार नाही. 
- अमोल पालेकर (चित्रपट, नाट्य) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com