ग्रामपंचायत निवडणुकीतील यशाबद्दल मोदींकडून भाजपचे अभिनंदन 

Narendra Modi
Narendra Modi

पुणे : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे अभिनंदन केले आहे. 

थेट मोदी यांनीच ट्‌विटरवरून कौतुक केल्याने त्याचा मोठा बोलबाला झाला आहे. मोदींनी सलग तीन ट्विट करून हा विजय साजरा केला आहे. महाराष्ट्रातील जनतेचे मनःपूर्वक आभार, असे मोदींनी म्हटले आहे. तसेच भाजप सरकारने युवक, शेतकरी यांच्यासाठी केलेल्या कामाची ही पावती असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

मुख्यमंत्री, दानवे यांनी ते रिट्‌विट केले. खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी त्यासाठीची आकडेवारीच सादर केली. इतर मंत्र्यांनीही आपापल्या भागात भाजपच आघाडीवर असल्याची ग्वाही दिली. त्यामुळे ग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंत भाजपच एक नंबर ठरल्याचे चित्र सोशल मीडियात उमटले आहे.

ग्रामपंचायत निवडणूक राजकीय पक्षांच्या चिन्हावर लढवली जात नाही. मात्र भाजपचे पदाधिकारी गावपातळीवर सरपंचपदाच्या निवडणुकीला उभे राहून बहुमताने जिंकले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भाजप राज्यात नंबर एकचा पक्ष बनला आहे, असा दावा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला होता. सोशल मिडियातही त्याचीच री ओढली गेली. सर्वत्र भाजपला जोरदार यश मिळाल्याचा दावा करण्यात आला. इतर विरोधी पक्षांनी या निकालाबाबत मौन बाळगल्याने भाजपचेच म्हणणे खरे असल्याचा संदेश गेला. 

राज्यात पहिल्या टप्प्यात झालेल्या तीन हजार ग्रामपंचायतींची मतमोजणी झाली आहे. प्रदेश भाजपच्या वतीने या संदर्भात काढलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, की राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाने जबरदस्त यश मिळविले असून भाजप "नंबर वन' ठरला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला कौल दिल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी गावकऱ्यांचे आभार मानले व भाजप कार्यकर्त्यांचे या यशाबद्दल अभिनंदन केले. सुमारे दोन हजार ग्रामपंचायतींवर भाजपचे सरपंच निवडून आल्याचा दावा करण्यात आला आहे. 

दानवे म्हणाले की, राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांप्रमाणे ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतही भाजपच "नंबर वन' ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या कामगिरीवर राज्यातील ग्रामीण जनतेने विश्वास व्यक्त केला आहे. भाजप सरकारच्या विरोधात ग्रामीण भागात वातावरण तापवू पाहणाऱ्या विरोधी पक्षांना मतदारांनी खणखणीत उत्तर दिले आहे. सरपंचांची थेट निवड पहिल्यांदाच होत असून या बदलाला ग्रामीण जनतेने उत्साही प्रतिसाद दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com