सरकारची कबुली; शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याचा दावा
मुंबई - नागपूर येथील मिहान प्रकल्पातील 230 एकर जमीन पतंजली समूहाला दिल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार यांनी शनिवारी विधान परिषदेत दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रकाश गजभिये यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
मिहान प्रकल्पासाठी 2600 सामान्य कुटुंबांची जमीन कवडीमोलाने संपादित केली असताना प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला दिला नसल्याची बाब प्रकाश गजभिये यांनी सरकारच्या निदर्शनास आणली. तसेच, अनेक उद्योगांनी जमीन ताब्यात घेतली, परंतु उद्योग उभारले नसल्याने जमीन ताब्यात घेण्याची त्यांनी मागणी केली. या वेळी उत्तर देताना येरावार म्हणाले, की "मिहान'मध्ये लहान- मोठ्या 20 कंपन्या कार्यरत आहेत. येत्या सहा महिन्यांत पतंजलीसह इंडमार एव्हिएशन, मोंजिनिस, प्लॅनमटेक, रिलायन्स, मार्क्सन फार्मा आदी दहा कंपन्यांचे बांधकाम सुरू होणार आहे. यामुळे 10 हजार नवीन रोजगार निर्माण होणार आहेत. पतंजलीमार्फत 230 एकर जमिनीवर "फूड पार्क' उभारण्यात येणार आहे. पतंजली उद्योग स्थानिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा देखील फायदा होणार असल्याची माहिती येरावार यांनी दिली.
|