मुंबई: कोरोना रुग्णांच्या (corona patient) वाढत्या संख्येमुळे राज्य सरकारमधील मंत्री नितीन राऊत (nitin raut) यांनी, पुन्हा एकदा निर्बंध (restriction) लावले जाऊ शकतात, असं विधान केलं. त्यांच्या या वक्तव्याचा मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांना आपल्या खास शैलीत समाचार घेतला आहे. "काही गोष्टी सुरु केल्या, तर रुग्ण संख्या वाढणार, त्यात एवढं स्तोम माजवण्यासारखं काय आहे?. संजय ओक यांना भेटलो तेव्हा, त्यांनी ऑक्सिजन रुग्णांच्या संख्येवर लॉकडाउन अवलंबून असेल, असं सांगितलं. मग हे लोकांना का घाबरवत आहेत?" असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.
"9 चे 10 रुग्ण झाले म्हणून डबल झाले असं म्हणत नागपूरचे पालकमंत्री लोकांना घाबरवत आहेत. किडनीचा आजार असलेला रुग्ण मृत्युमुखी पडला तर त्याचा मृत्यू किडनी फेल्युअर मुळे झाला की कोरोनामुळे हा सुद्धा सवाल आहे. यासंदर्भातला फरक कोणी केलाय का नाही? लोकांना फक्त घाबरवण्याचं काम सुरू आहे. या आठवड्यामध्ये चार आत्महत्या झाल्या, बेकारीमुळे, नोकरीधंदा नसल्यामुळे अशा पद्धतीने लोकांचा जीव घेणार आहात का? सरकार म्हणून याबद्दल काही विचार केलाय का?" असे प्रश्न संदीप देशपांडे यांनी विचारले आहेत.
"नितीन राव कुठल्या आधारावर म्हणाले. ते एक्सपर्ट आहेत का? पालकमंत्री आहात ना, मग कुठल्या आधारावर तुम्ही सांगताय तिसरी लाट आली आहे. काल स्वतः मुख्यमंत्री माँ साहेबांच्या स्मृतीदिनाला आले होते, तेव्हा किती गर्दी झाली होती" त्याकडे संदीप देशपांडे यांनी लक्ष वेधलं. "कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मग रिकवरी रेट काय आहे? सरकारने सिलेक्टिव्ह बातम्या देऊ नये" असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं. "एक कोटी लोकांचं लसीकरण झालं आहे. जगाने सांगितलं आहे की, ज्यांनी लस घेतली, त्यांना कोरोनाचे गंभीर परिणाम भोगावे लागणार नाहीत. तरी तुम्ही लोकांना घाबरवता आहात. दोन्ही लस घेतल्यानंतर पण कोरोना होणार असेल तर तसं सरकारने जाहीर करावं. टास्क फोर्सचे जे कोण ठोंबे बसले आहेत. त्यांनी जाहीर करावं एकदा की लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर पण तुम्हाला गंभीर स्वरूपाचा कोरोना होणार आहे. लोकांना काय ते खरं कळू द्या अर्धवट माहिती देऊ नका" असे देशपांडे म्हणाले.
"यांचं आंदोलन झालं, यांचे मेळावे झाले, वरूण सरदेसाईचा महाराष्ट्र दौरा झाला. आमचं सगळं झालं आता आम्ही तुम्हाला निर्बंध घालणार. या इलेक्शन मध्ये विरोधी पक्षाला काम करता येऊ नये आणि स्वतःचा घोडा पुढे दामटाव यासाठी सगळं धंदे आहेत" असा आरोप देशपांडेंनी केला. "यांचे मंत्री जाऊन अभिषेक करतात त्यांना कसं परवानगी दिली गेली. तुम्ही करता ते सगळं बरोबर आणि दुसऱ्यांना शहाणपण शिकवायला पुढे. लोकांना कळतंय की, पैसे खाण्यासाठी धोरणाचा वापर होतोय. हा नुसता रोग नसून तो राजकीय रोग झाला आहे" अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.