पुणे - नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) जोर ओसरल्याने राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ वातावरण असल्याने ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे.
मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही भागात कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा वाढला आहे. मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र, प्रवाह थंडावल्याने मॉन्सूनची वाटचालही थांबली असून, पावसात मोठा खंड पडण्याची शक्यता आहे. राज्यात तळकोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे; तर उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मंगळवारी सकाळी राज्यात पावसाने उघडीप दिली होती. ढगाळ हवामानामुळे तापमानाचा पारा सरासरीच्या खाली असला, तरी उघडीप मिळाल्याने तापमानात हळूहळू वाढ होत आहे.
मॉन्सूनची प्रगती नाही
पुढील आठ दिवसांत मॉन्सूनची वाटचाल होणार नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात ठाणे, नगर, बुलडाणा, अमरावती, गोंदियापर्यंत मॉन्सून पोचला आहे. मात्र, कोकण, मध्य महाराष्ट्रात शनिवारपासून तर विदर्भात सोमवारपासून मॉन्सूनची प्रगती झालेली नाही.
|