मुंबई - विधान परिषदेच्या 7 डिसेंबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीत "अदृश्य बाण' चालून चमत्कार घडून येईल, अशी गुगली कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी टाकत राजकीय चर्चेला नवे वळण देण्याचा प्रयत्न केला आहे.
या पोटनिवडणुकीसाठी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार म्हणून दिलीप माने यांचा अर्ज सोमवारी दाखल केल्यानंतर विधान भवन परिसरात ते पत्रकारांशी बोलत होते. चव्हाण म्हणाले, की शेतकरी कर्जमाफी, हमीभाव आदी मुद्यांवर शिवसेना सतत सरकारविरुद्ध नाराजी व्यक्त करत आहे. काल-परवाच त्यांनी सत्ता सोडण्याचाही इशारा दिलेला आहे. एकंदर राजकीय परिस्थिती पाहता या पोटनिवडणुकीत "अदृश्य बाण' चालून विरोधी पक्षांचे उमेदवार दिलीप माने विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तत्पूर्वी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पक्ष आदींसह सर्व समविचारी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार म्हणून सोलापूर जिल्ह्यातील कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा अर्ज दाखल करतेवेळी खा. अशोक चव्हाण यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, माजी मंत्री नसिम खान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार हेमंत टकले, माजी मंत्री नवाब मलिक यांच्यासह विरोधी पक्षांतील अनेक आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, भाजपच्या वतीने प्रसाद लाड यांना उमेदवारी देत निष्ठावंतांना डावलल्याची नाराजी सुरू झाली आहे. भाजप व शिवसेना यांची युती झाल्याने लाड यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तरीही अशोक चव्हाण यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करत राज्यातील विविध प्रश्नांवरून भाजपवर टीका करणाऱ्या शिवसेनेला कोंडीत पकडण्याची खेळी सुरू केल्याचे मानले जात आहे.
|