मुंबई - कॉंग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधी यांची नियुक्ती झाल्यानंतर पक्षामध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहे. विशेषत: तरुण रक्ताला पक्षसंघटनेत वाव देण्याचा विचार पुढे आला आहे. त्यानुसार महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी खासदार राजीव सातव यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभेच्या 2014 मधील निवडणुकीत अशोक चव्हाण आणि राजीव सातव खासदार झाले. मात्र, त्यानंतर विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे कॉंग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी संघटनात्मक पातळीवर पुढील काळात मोठे बदल केले जाणार आहेत. यामध्ये ज्येष्ठ नेत्यांना त्यांच्या पदांचा राजीनामा द्यावा लागणार आहे.
गुजरात निवडणुकीत कॉंग्रेसला चांगले यश मिळाले आहे. त्यानंतर राहुल गांधी यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यामुळे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले सातव यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड होईल, अशी चर्चा आहे. सातव हे वादापासून दूर असून, ते पक्षाचा ओबीसी चेहरा म्हणूनही परिचित आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येते.
पटोलेही चर्चेत
विदर्भातील शेतकरी आणि ओबीसी समाजाचे नेते नाना पटोले यांनी भाजपला राम राम केला आहे. ते कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे विदर्भात कॉंग्रेस कात टाकणार असे दिसते. त्यामुळे त्यांच्यावरही संघटनात्मक पातळीवर काही जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते.
|