मुंबई - कर्जमाफीबाबत खोटी आकडेवारी जाहीर करून सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. शिवसेनेचीही भूमिका दुटप्पी असून, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होईपर्यंत कॉंग्रेसचा लढा सुरूच राहील, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले.
सरकारच्या फसव्या कर्जमाफीविरोधात कॉंग्रेसने एल्गार केला आहे.
बुधवारी बुलडाणा येथे खासदार चव्हाण यांनी "माझी कर्जमाफी झाली नाही' या राज्यव्यापी आंदोलनाची सुरवात केली. त्यानंतर एल्गार सभेत चव्हाण यांनी राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले, की राज्य सरकारचा शेतकरीविरोधी चेहरा नागरिकांसमोर आला आहे. "एक ही भूल, कमल का भूल' असे राज्यातील शेतकरी म्हणू लागले आहेत. सरकारने जाहीर केलेली आकडेवारी खोटी असून, सरकार नागरिकांची फसवणूक करत आहे. सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी 34 हजार कोटींची नसून, फक्त पाच हजार कोटी रुपयांची आहे. केवळ 15 लाख शेतकऱ्यांनाच याचा फायदा होणार आहे.
कर्जमाफीपासून दूर राहिलेल्या आणि सातबारा कोरा न झालेल्या राज्यभरातील शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांचे अर्ज बैलगाडीतून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवले जातील. सरकारने 30 जून 2017 पर्यंतच्या सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. सरसकट कर्जमाफी होईपर्यंत कॉंग्रेसचा लढा सुरूच राहील, असेही चव्हाण यांनी नमूद केले.
|