मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. चैत्यभूमीला तीर्थक्षेत्राचा दर्जा आधीच मिळाला आहे. इतर धर्मीयांच्या तीर्थक्षेत्रांना ज्याप्रमाणे सरकार निधी देते, त्याच धर्तीवर चैत्यभूमीलाही निधी मिळावा, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समन्वय समितीने केली आहे. आपण या मागणीचा पाठपुरावा करणार असून, पुढच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत याबाबतचा निधी मिळेल, अशी ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.
महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेदेखील या वेळी उपस्थित होते. आठवले म्हणाले, महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने मुंबई महापालिका या वर्षी 2 कोटी 25 लाख रुपयांचा निधी देणार आहे.
चैत्यभूमीला आधीच तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे. इतर धर्मीयांच्या तीर्थक्षेत्रांना ज्याप्रमाणे सरकार निधी देते त्याचप्रमाणे चैत्यभूमीलाही निधी मिळावा, अशी मागणी समन्वय समितीने केली आहे. या वर्षी आता तातडीने तरतूद करणे शक्य नाही. मात्र पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात तरतूद करून हा निधी देण्यात येईल, अशी ग्वाही रामदास आठवले यांनी दिली. इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम येत्या 2019 पर्यंत पूर्ण होईल, अशी आपल्याला आशा आहे, असेही रामदास आठवले म्हणाले.
|