मुंबई - दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या "राणी पद्मावती' चित्रपटाला विरोध करण्यासाठी आता पर्यटनमंत्री जयकुमार रावल मैदानात उतरले आहे. राजपुतांचा स्वाभिमान असणाऱ्या राजपूत राणी पद्मावती यांच्या व्यक्तित्वाला चित्रपटातून डागळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप रावल यांनी केला आहे. या चित्रपटावर बंदी आणावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राणी पद्मावती चित्रपटावर बंदी आणावी, अशी मागणी राजपूत संघटनांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. संघटनांचे नेतृत्व जयकुमार रावल यांनी केले. रावल म्हणाले, की राणी पद्मावतीच्या कथा ऐकून राजपुतांची मुले मोठी होतात. राजपुतांच्या गौरवाचा इतिहास राणी पद्मावतींचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होणार नाही. कोणत्याही विभूतीचे चारित्र्य पैसा कमावण्यासाठी किंवा कलेच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली केला जाऊ नये, असे मतही त्यांनी व्यक्त केले. चित्रपटातील कलाकारांवरही रावल यांनी टीका केली. कलेतून महनीय व्यक्तींची बदनामी होणार नाही याची काळजीही कलाकारांनी घेण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
|