मुंबई - राज्यातील नवबौद्ध समुदायास बौद्ध समाजाप्रमाणे अल्पसंख्याक विकास विभागाच्या सर्व सुविधा तसेच योजनाचा लाभ यापुढे मिळणार आहे. अल्पसंख्याक विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. याचा लाभ राज्यातील सुमारे 50 लाख नवबौद्ध बांधवांना मिळणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे धर्मांतर करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्यांच्याबरोबर राज्यातील बहुसंख्य अनुयायांनीसुद्धा बौद्ध धर्माचा स्वीकार केला. या बौद्ध धर्म स्वीकारलेल्या अनुयायांना अनुसूचित जातीचे लाभ देण्याकरिता सरकारने नवबौद्ध संबोधून अनुसूचित जातीचे कायदेशीर लाभ दिले आहेत. बौद्ध धर्मातील कोणत्याही व्यक्तीस 1990 पर्यंत कायदेशीररीत्या अनुसूचित जातीचे लाभ केंद्र सरकार देत नसल्याने राज्य सरकारने धर्मांतर केलेल्या अनुयायांना नवबौद्ध असे संबोधून अनुसूचित जातीचे लाभ दिले आहेत. धर्मांतरीत बौद्धांना अनुसूचित जातीचे लाभ देण्यासाठी नवबौद्ध ही संज्ञा वापरली आहे. मात्र असे असले तरीही हे अनुयायी धर्माने बौद्धच आहेत. म्हणून राज्यातील नवबौद्धांना कायदेशीररीत्या बौद्ध समजणे अनिवार्य आहे. तसेच त्यांना बौद्ध अल्पसंख्याकांचा दर्जा 1956 पासून प्राप्त झाला आहे. याला अनुसरून त्यांना अल्पसंख्याकांसाठी राबवण्यात येत असलेल्या सर्व सुविधा, योजना यांचा लाभ मिळण्यास कोणतीच अडचण येत नाही. ते कायदेशीररीत्या प्राप्त ठरले आहेत, असे अल्पसंख्याक विभागाने परिपत्रकात म्हटले आहे. राज्यात मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारशी व जैन, ज्यु या धार्मिक समुदायास अल्पसंख्याक समुदायाचा दर्जा घोषित करण्यात आला आहे.
|