मुंबई - विधान परिषद पोटनिवडणुकीच्या निमित्ताने निष्ठावंतांना डावलण्याची भाजपची परंपरा पुन्हा एकदा कायम राहिली आहे.
या पोटनिवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून आलेल्या प्रसाद लाड यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांच्या नावाची कायम चर्चा होते; मात्र शेवटच्या क्षणी त्यांना डावलले जाते.
या वेळेस भांडारी यांच्यासह भाजपच्या नेत्या शायना एन. सी., कोकणातील भाजपचे नेते प्रमोद जठार, बाळ माने, प्रवक्ते केशव उपाध्ये आदींच्या नावांची चर्चा होती. अर्ज भरण्याची अंतिम तारीख जवळ आल्यानंतर भांडारी आणि शायना यांची नावे आघाडीवर होती. मात्र प्रसाद लाड यांनी बाजी मारली. त्यामुळे निष्ठावंतांना डावलण्याची भाजपची परंपरा कायम राहिली आहे. यापूर्वी भाजपने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रवीण दरेकर यांना आमदार केले. त्या वेळी मुंबई भाजपत उघड विरोध झाला होता. त्यापूर्वी भाजपने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना आमदार करून मंत्री केले, तर राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनाही आमदार करून कॅबिनेट मंत्री केले. हे दोन्ही नेते भाजपच्या घटक पक्षांचे नेते आहेत. म्हणून त्यांना आमदारकी दिली असे असले, तरी भाजपमधील निष्ठावानांना डावलण्यात आले होते.
पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी मी पार पाडत असतो. मी या निवडणुकीसाठी उमेदवारी मागितली नव्हती. मी नाराज होण्याचा प्रश्न येत नाही.
- माधव भांडारी, मुख्य प्रवक्ते, भाजप
|