मुंबई - पीकविमा आता बॅंकांमध्ये ऑफलाइन पद्धतीने भरण्यात येणार आहे. यापुढे पीकविम्यासाठी मुदतवाढ देणे शक्य नाही. दोन ते तीन महिन्यांत "केवायसी' करण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्याला स्वत:च्या खात्यात पैसे भरता येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.
पीकविम्यासंदर्भात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, की पीक येणार की नाही हे कळल्यानंतर विमा काढता येत नाही. त्यामुळे पुन्हा पीकविम्यासाठी मुदतवाढ देता येणार नाही. पाच ते सहा जिल्ह्यांत समस्या उद्भवली असल्याचे आढळून आले आहे. तिथे वाढीव मनुष्यबळ देऊन तातडीने कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. ऑफलाइन पद्धतीने पीकविमा काढावा, अशा सूचना सर्व संबंधित बॅंकांना देण्यात आल्या आहेत.
एका शेतकऱ्याने विविध बॅंकांतून पीकविमा घेतला असल्याचे आढळून आले आहे. भविष्यात या समस्या उद्भवू नयेत, यासाठी शेतकऱ्यांचे "केवायसी' करण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना स्वत:च्या खात्यात विम्याचे पैसे भरता येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. यासंदर्भातील अधिक माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.
|