मुंबई - उल्हासनगरमध्ये दहावीच्या इतिहास आणि विज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यावर संबंधितांवर योग्य कारवाई केली जाईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिले.
कॉंग्रेसचे संजय दत्त यांनी या संदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. उल्हासनगरमध्ये सोमवारी झालेल्या पेपरफुटीत कोंचिंग क्लासेसचा सहभाग असल्याचा संशय असल्याचे तावडे म्हणाले.
प्रश्नपत्रिकांचा गठ्ठा परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास आधी त्याचे सील उघडले जाईल, असा निर्णय केल्यामुळे पेपरफुटीच्या घटना कमी झाल्या आहेत. ज्या केंद्रांवर अशा घटना झाल्या त्या केंद्रांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णयही घेतला होता; मात्र ही कारवाई थांबवण्यासाठी काही लोकप्रतिनिधींकडून दबाव आणला जातो. त्यामुळे सर्व सदस्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
|