मुंबई - प्लॅस्टिक बाटल्यावरील बंदीच्या नियमानुसार प्लॅस्टिक बाटली उत्पादन कंपन्यांनी विक्री केलेल्या बाटल्या बाजारातून पुन्हा संकलित करून त्याचा पुनर्वापर करण्यासंबंधीचे प्रकल्प तयार करावेत. शासनाची अभ्यास समिती प्लॅस्टिक बाटलीला पर्याय आणण्यासंदर्भात लवकरच अहवाल सादर करणार आहे, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज सांगितले.
मंत्रालयात आज प्लॅस्टिक बाटली निर्मिती व पुनर्वापर यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कदम बोलत होते. या बैठकीस उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. कदम पुढे म्हणाले, शासकीय कार्यालय आणि स्टार हॉटेलमध्ये प्लॅस्टिक बाटली बंद करण्याचा निर्णयाची अंमलबजावणी पुढील तीन महिन्यांत करण्यात येणार आहे. यासाठी अभ्यास दौरा करण्यात येणार असून, अभ्यासपूर्ण अहवाल सादर करण्यात येणार आहे. उद्योगांवर विपरीत परिणाम होऊ नये आणि पर्यावरणाचा समतोल राखता यावा, याचबरोबर प्लॅस्टिकला पर्याय आणता येतील का, यासंदर्भात उपाय सुचविण्यात येणार आहेत. प्लॅस्टिक बाटलीचे पुनर्वापर, त्यांचे संकलन उत्पादन कंपन्यांनी करणे आवश्यक आहे. त्या अंतर्गत निर्जंतुकीकरण आणि स्वच्छ करून पुन्हा वापरासाठी उपलब्ध केल्यास नवीन प्लॅस्टिक बाटल्यांचे उत्पादन कमी होऊ शकेल, अशी माहिती कदम यांनी आज दिली.
|