नागपूर - 'एकनाथ खडसे हे प्रस्थापित नेते आहेत, तर नारायण राणे हे "विस्थापित' नेते आहेत. विस्थापितांचे पुनर्वसन होते, प्रस्थापितांचे नाही,'' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांच्या मंत्रिमंडळातील फेरप्रवेशाची शक्यता अप्रत्यक्षरीत्या आज फेटाळली.
अनेक दिवस राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबरोबरच "एनडीए'चे घटक पक्ष बनलेले नारायण राणे आणि भ्रष्टाचारासह विविध आरोपांमुळे मंत्रिपदावरून पायउतार झालेले एकनाथ खडसे यांच्या समावेशाबाबत चर्चा सुरू आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून नागपूरला आलेल्या पत्रकारांशी "सुयोग' येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी संवाद साधला व विस्ताराची दिशा स्पष्ट केली.
यंदाच्या अधिवेशनात खडसे हे पक्षातील ज्येष्ठ नेते असूनही सातत्याने राज्य सरकारच्या धोरणांवर विधानसभेत हल्ला चढवत आहेत. त्यामुळे खडसेंचा मंत्रिमंडळात समावेश होणार का, मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारले. त्यावर पुढील अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार झालाच पाहिजे, असे सांगत त्यात "विस्थापितांना' स्थान मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सूचित केले.
गुजरातमधील निवडणूक निकालावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, '22 वर्षांनंतरही गुजरातमधील 50 टक्के नागरिकांनी भाजपवर विश्वास दाखवला आहे. राजकीय गणितानुसार भाजपच्या मतांमध्ये दीड टक्के वाढ झाल्याचे दिसत असल्याने गुजरातमधील विजय एकहाती आहे.''
रिफायनरीमुळे प्रदूषण नाही
कोकणात येणार असलेल्या पेट्रोलियम कंपन्यांच्या शुद्धीकरण प्रकल्पांविषयी ते म्हणाले, 'सध्या शिवसेनेकडून विरोध होत असला, तरी हा तेलशुद्धीकरण प्रकल्प आणण्यासाठी शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गिते, खासदार विनायक राऊत यांनी प्रयत्न केले. ही "ग्रीन रिफायनरी' असल्याने प्रदूषण होणार नसून त्याचा परिणाम समुद्रातील वन्यजीवांवरही होणार नाही. मुंबई आणि चेन्नईतील काही "एनजीओं'कडून जाणीवपूर्वक विरोधात वातावरण निर्माण करून आंदोलने केली जात आहेत.''
|