मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील तीन आरोपींना 90 दिवसांत आरोपपत्र दाखल केले नाही म्हणून मिळालेला जामीन हा अतिशय संतापजनक असून, या आरोपींना जामीन मिळावा ही सरकारचीच इच्छा असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. सरकारमधील साधकांचे चेहरे जनतेसमोर उघडे पडत चालले आहेत, अशी टीकाही सावंत यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
सावंत म्हणाले, की अमोल काळे, राजेश बंगेरा आणि अनिल दिगवेकर यांना केवळ कर्नाटक "एसआयटी'च्या प्रयत्नांमुळे पकडण्यात आले.
'सीबीआय'सारखी यंत्रणादेखील या आरोपींपर्यंत पोचू शकली नाही हे वास्तव आहे. "सीबीआय'ने या तिघांवरही गुन्हे दाखल केले होते. परंतु 90 दिवसांत दोषारोपपत्र दाखल केलेच नाही. "सीबीआय'चे वकील जवळपास दोन दिवस न्यायालयात हजरही नव्हते. यातूनच सरकार जाणीवपूर्वक या प्रकरणात बोटचेपी भूमिका घेत आहे, हे स्पष्ट दिसून येते. कर्नाटक सरकारने प्रामाणिकपणे चौकशी केली नसती, तर हे प्रकरण कधीच दडपण्यात आले असते, असेही सावंत म्हणाले.
|