
मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी २९ जून रोजी अंधेरीत केलेल्या वक्तव्यानंतर त्याच्यावर जोरदार टीका केली जात होती. राज्यपाल कोश्यारी यांनी प्रसिद्धीपत्रक काढत आपल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत माफी मागितली आहे, त्यांच्या माफीनाम्यावर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवार यांनी ट्वीट केलं असून त्यामध्ये ते म्हणाले आहेत की, "मनावर दगड ठेवून राज्यपालांनी मागितलेल्या माफीचा स्वीकार करून मराठी माणूस त्यांना माफ करण्याचा प्रयत्न करेल देखील, मात्र अशाच प्रकारे त्यांनी छ. शिवाजी महाराज, महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची देखील माफी मागितली असती तर अधिक चांगले झाले असते अजूनही वेळ गेलेली नाही."
राज्यपाल काय म्हणालेत?
राज्यपालांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिनांक २९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडुन कदाचित काही चुक झाली.महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे.
गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. परंतु, त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही. हाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो, असे कोश्यारी म्हणाले आहेत.
वाद काय आहे?
भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते की, कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही, दरम्यान त्यांच्या या विधानानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर कोश्यारी यांनी राज्याच्या जनतेची माफी मागितली आहे.