महाराष्ट्राचे तरुण मुख्यमंत्री ते देशाचे कृषीमंत्री; वाचा शरद पवारांची राजकीय कारकीर्द

sharad pawar.
sharad pawar.

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस. शरद पवार यांचे नाव महाराष्ट्रातच नाही, तर देश पातळीवर आदराने घेतले जाते. 1978 ते 1980, 1988 ते 1991 आणि 1993 ते 1995 या  कालखंडांदरम्यान पवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भूषवलं आहे. केंद्रातही त्यांनी अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या संभाळल्या आहेत. 12 डिसेंबर 1940 साली जन्मलेले शरद पवार 50 पेक्षा अधिक वर्ष राजकारणात सक्रीय आहेत.
राजकारणाची सुरुवात

1956 साली शाळेत असताना पवारांनी गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला. तेथून त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली, असं म्हणता येईल. विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले. शरद पवारांनी यावेळी केलेल्या एका भाषणामुळे यशवंतराव चव्हाण चांगलेच प्रभावीत झाले. यशवंतरावांच्या सांगण्यावरुनच पवारांनी पुढे युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 24 व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 1966 साली युनेस्को शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर पवारांनी पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड इत्यादी देशांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी तेथील राजकीय पक्षांचा अभ्यास केला. 

पहिली विधानसभा निवडणूक 

सर्वप्रथम 1967 साली विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले. वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात वयाच्या 29 व्या वर्षी त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले. 1972 आणि 1978 च्या निवडणुकीतही त्यांचा विजय झाला. 1978 साली वसंतदादा पाटील मुखमंत्री झाले. काँग्रेस पक्षाचे 12 आमदार फोडून पवारांनी विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली होती. त्यामुळे वसंतदादांचे सरकार पडले होते. 

18 जूलै 1978 साली रोजी शरद पवारांनी पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. 1980 साली इंदिरा गांधींचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली. त्यात पवारांचे सरकारही बरखास्त झाले.

लोकसभा निवडणूक लढवली

1984 साली शरद पवारांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. पण, त्यांनी राष्ट्रीय राजकारणात न जाता, राज्यातच राहण्याचा निर्णय घेतला. 1985 साली विधानसभा निवडणूक त्यांनी बारामतीतून जिंकली. त्यानंतर त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. 

काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश

1987 साली शरद पवारांनी राजीव गांधींच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे काँग्रेस(इंदिरा) पक्षात परत प्रवेश केला.1988 साली राजीव गांधींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा केन्द्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून समावेश केला. त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांची वर्णी लागली. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि भाजप पक्षाने युती केल्याने राज्यात काँग्रेससमोर आव्हान निर्माण झाले होते. तरीही 1990 मधील विधानसभा निवडणुकीमध्ये 12 अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर शरद पवार यांनी 4 मार्च 1990 रोजी मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली.

राजीव गांधी यांच्या हत्त्येनंतर पंतप्रधानपदी नरसिंह राव विराजमान झाले. नरसिंह रावांनी पवारांना केन्द्रीय मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून नेमले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या जागी सुधाकरराव नाईक यांना संधी देण्यात आली. पण, काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळे सुधाकरराव नाईक यांना राजीनामा द्यावा लागला. नरसिंह रावांनी शरद पवारांना पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नेमले. त्यांनी 6 मार्च 1993 रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा शपथ घेतली. पवारांची मुख्यमंत्रिपदाची चौथी कारकीर्द अनेक कारणांमुळे अत्यंत वादग्रस्त ठरली. 1995 मध्ये काँग्रेस पक्षाचा राज्यात प्रथमच पराभव झाला. राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले.

काँग्रेसच्या पाठिंब्याने भाजपचा विजय; 'राज'कारणात शत्रूंचं झालं...

1996 साली शरद पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आणि ते राष्ट्रीय राजकारणात उतरले. 1997 मध्ये त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सीताराम केसरी यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली पण तीत त्यांचा पराभव झाला. 1999 मध्ये त्यांनी इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींऐवजी भारतात जन्मलेल्या कोणाही नेत्याला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करावे, अशी मागणी केली. या कारणासाठी काँग्रेस पक्षाने त्यांना 6 वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले होते.

पक्षाची स्थापना

10 जून 1999 रोजी शरद पवारांनी त्यांच्या 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची' स्थापना केली. 1999 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींनंतर कोणत्याही पक्ष अथवा आघाडीस बहुमत मिळाले नाही. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होऊन विलासराव देशमुख राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. 2004 मध्ये राष्ट्रवादी केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये सामील झाला.  2004 मध्ये शरद पवारांनी देशाचे कृषिमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. 2009 साली केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना कृषी, ग्राहकांशी संबंधित बाबी, अन्न आणि सार्वजनिक वितरण ह्या खात्यांची धुरा देण्यात आली. 2014 मध्ये पवारांनी लोकसभा न लढण्याचा निर्णय घेतला होता. ते सध्या राज्यसभेवर खासदार आहेत. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी पक्षाला 52 जागा मिळाल्या. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे मिळून महाआघाडीचे सरकार महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यात शरद पवार यांचा मोलाचा वाटा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com