
तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५४ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हातभट्टी तयार केली जाते. हा अवैध व्यवसाय आता पारंपारिक झाला असून एका पिढीनंतर आता तरुणही या अवैध व्यवसायात उतरले आहेत. तरूणांच्या हाताला कोणता रोजगार नाही, बॅंकांकडून अर्थसहाय्यही मिळत नाही. त्यांच्यात शिक्षणाचा अभाव, सरकारी नोकरीबद्दल माहिती नाही, रोजगार मेळाव्यांबद्दल अनभिज्ञ असल्याची कारणे आहेत. त्यामुळे शेकडो तरुण हातभट्टीच्या अवैध व्यवसायात उतरत आहेत. पूर्वी त्यांच्यासाठी रोजगार मेळावे व्हायचे, पण आता त्यासाठी पोलिसांचा पुढाकार दिसत नाही.
तत्कालीन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना त्यांच्या परिविक्षाधिन कालावधीत मुळेगाव तांडा असो की सोलापूर जिल्ह्यातील हातभट्ट्या गुन्हेगारीचे मूळ असल्याची जाणीव झाली होती. काही वर्षांनी त्या सोलापूरच्या पोलिस अधीक्षक झाल्या, त्यावेळी देखील ही ओळख तशीच होती. या अवैध व्यवसायामुळे अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याने त्यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये ‘ऑपरेशन परिवर्तन’ राबविण्याचा निर्णय घेतला. हातभट्टी निर्मिती व विक्री होणाऱ्या गावांची माहिती त्यांनी संकलित केली. त्याचा कृती आराखडा तयार करून त्यावर बारकाईने काम केले आणि या अवैध व्यवसायातील तरुणांसाठी, महिलांसाठी त्यांनी मार्गदर्शन शिबिरे, स्वयंरोजगाराचे धडे, बॅंकांकडून अर्थसाहाय्य आणि रोजगार मेळावे, असे उपाय केले. त्याला यश आले आणि ७०० पेक्षा जास्त लोकांनी हा अवैध व्यवसाय सोडला.
पण, पुन्हा हातभट्टीचा अवैध व्यवसाय जोमाने सुरू झाला आहे. त्यातून अनेक विवाहिता विधवा झाल्या, अनेक कुटुंबातील तरुण मयत झाल्याने म्हातारपणी आई-वडील निराधार झाले. तंटामुक्त गावांमध्ये वाद सुरू झाले, गुन्ह्यांची संख्याही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक हे हातभट्टीच्या अवैध व्यवसायातील तरुणांसाठी रोजगार मेळावे घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधानांनी केला होता ‘एसपीं’चा गौरव, पण...
ऑपरेशन परिवर्तन हा उपक्रम खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मांडला होता. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तत्कालीन पोलिस अधीक्षकांना ‘पीएम ॲवॉर्ड फॉर एक्सलेन्स’ पुरस्कार देऊन त्यांचा सन्मानही केला होता. देशपातळीवर आदर्श ठरणारा हा उपक्रम वरिष्ठांमुळे सध्या दुर्लक्षितच आहे.
तंटामुक्त गावांमध्ये वाढली भांडणे
मोहोळ तालुक्यातील हिवरे हे गाव राज्याच्या ‘तंटामुक्त गाव’ अभियानात पहिले आले होते. २००७ पासून या गावांमध्ये दारूबंदी असून गावातील वाद-विवाद बंद होते. पण, आता अभियान बंद असून गावाच्या हद्दीत हातभट्टीसह मद्यविक्री जोरात सुरू आहे. त्यामुळे गावात भांडणे वाढल्याचे तत्कालीन तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांनी सांगितले. असे प्रकार जिल्ह्यातील सर्रास गावांमध्ये सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.